पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर २ आठवड्यांनी महायुती सरकारचा शपथविधी झाला. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पुढची पाच वर्ष त्यांनी राज्याची सेवा करावी. महाराष्ट्राचा हक्क दुसऱ्या कुठल्या राज्याला त्यांनी देऊ नये, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज (दि.६) लगावला.
खा. सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरूवारी म्हणाले लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये सुरू करणार आहे. शक्य असेल तर १ जानेवारी २०२५ पासून ती सुरू करावी. आमची अपेक्षा ३ हजार द्यावेत अशी आहे. विरोधकांची सशक्त लोकशाहीमध्ये गरज असते. आम्ही देशाच्या हितासाठी सहकार्य करत असतो, व्यक्ती हितासाठी आम्ही सहकार्य करत नाही.
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल आम्ही १०० टक्के मान्य करत नाही. या निकालाविरूद्ध आम्ही निवडणूक आयोगात गेलो आहोत. माजी आमदार संग्राम थोपटे यांना भोर मतदारसंघातील एका बूथवर १ मत मिळाले आहे, हे अशक्य आहे. दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. हे शेतकरी विरोधी सरकार आहे, हे आम्ही सांगत आहोत. कपाशी, सोयाबीनला भाव नाही, हे आम्ही सांगत आलो आहे, असे सुळे म्हणाल्या.