

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीने भोंदू अशोक खरात प्रकरणाची चौकशी करणार्या विशेष तपास पथकाकडे केली आहे. यामुळे राजकीय आणि पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली असून, खरात याला तुरुंगात पुरेशी सुरक्षा दिली जावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
खरात प्रकरणाशी संबंधित तपास सुरू असतानाच या नव्या तक्रारीमुळे तपासाची दिशा अधिक गुंतागुंतीची बनली आहे. तक्रारदाराने केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि किती खोडसाळपणा आहे, याची सखोल चौकशी करण्याची जबाबदारी आता एसआयटीवर आहे. या प्रकरणात राजकीय हेतू असण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
खरातच्या सुरक्षेत वाढ करा : दमानिया
खरात प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे तुरुंगातही त्याच्या जीवाला धोका आहे यात शंका नाही. खरातला अशा गोष्टी माहिती असाव्यात की, त्या बाहेर येऊ नयेत म्हणून खरातचे काही बरेवाईट केले जाईल ही भीती त्याच्यासह आम्हा सर्वांना आहे. प्रकरण दाबायचे असेल तर त्याच्या जीवाचे काही बरेवाईट करत फाईल बंद करण्यात येईल. हे होऊ नये म्हणून त्याला सुरक्षा देण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
खरात बोलू लागला मरणाची भाषा
भोंदू खरातची एसआयटीकडून तब्बल 15 गुन्ह्यांत दररोज 8 ते 10 तास चौकशी केली जात आहे. 25 दिवसांच्या या सततच्या चौकशीमुळे तो त्रस्त झाला असून चौकशीपेक्षा मरण परवडेल अशी भाषा तो करू लागल्याचे सूत्रांनी सांगितले. चौकशी तीव्र झाली तसतसा खचत गेला. मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे, असे तो बोलू लागल्याचे समोर आले आहे.
सुनेत्रा पवारांनी सावध राहावे ः शिरसाट
या पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सावध राहण्याचा, स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
सुनेत्राताईंची काळजी पोलिस खाते घेईल ः मुख्यमंत्री
सासवड : उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचे पोलिस खाते घेईल. महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलिस खात्याने यापूर्वी चांगली कामगिरी केलेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रूपाली चाकणकर यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका आहे, अशी तक्रार भोंदू अशोक खरात प्रकरणाची चौकशी करणार्या विशेष चौकशी पथकाकडे आल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, यासंदर्भात काही पत्र आले असेल तर त्याची चौकशी केली जाईल.