

मुंबई: प्रदेश काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख करत केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे अतिशय खालच्या स्तरावर उतरले आहेत. यांना जनता प्रतिसाद देत नाही, कोणी विचारत नाही म्हणून बातम्यांत राहण्यासाठी अशा पद्धतीचे काम सुरू आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला फटकारले.
मंत्रालयात माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मला असे वाटते की, अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही. त्यांना कुणी विचारत नाही. ‘बदनाम हुये तो हुये, नाम तो हुआ’ अशा पद्धतीने यांची कार्यवाही सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, एमपीएससी पेपरफुटीच्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, यापूर्वी जेव्हा आरोप झाले, तेव्हाच एमपीएससीने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. आरोप तीन महिन्यांनी झाले असले तरी, एमपीएससीने यासंदर्भात पोलीस तक्रार दाखल केली आहे आणि पोलीस चौकशीची मागणीही स्वतः एमपीएससीनेच केली आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महिलेच्या सन्मानावर झालेला आघात
बारामती : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काॅंग्रेस नेत्यांनी वापरलेली भाषा ही केवळ एका व्यक्तीवर केलेली टीका नसून निष्ठा, कठोर परिश्रम, जनसेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर झालेला थेट आणि निषेधार्ह आघात आहे, या शब्दात राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी काॅंग्रेसचा समाचार घेतला