

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम प्रवेश परीक्षेसाठी शुक्रवारी पवई येथील औरम आयटी पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. वाहतूक कोंडीमुळे वेळेत पोहोचता न आल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सेंटर बेस्ड ऑनलाइन एल. एल. एम. कॉमन एंट्रान्स टेस्टचे आयोजन दुपारी २ ते ३ आणि आणि संध्याकाळी ५ ते ६ या दोन सत्रात करण्यात आले होते. पवई परिसरातील तीव्र वाहतूक कोंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे शक्य झाले नाही. परिणामी त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, परिसरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. आंदोलक आणि पोलिसांमुळे आरे मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक कोंडीत अडकून पडले होते.
प्रवेशासाठी निश्चित वेळेपूर्वी केंद्रावर पोहोचलेल्या काही विद्यार्थ्यांनाही नोंदणी प्रक्रियेतील किरकोळ कारणांवरून प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अपवादात्मक परिस्थिती असूनही कोणतीही सवलत देण्यात आली नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
या घटनेमुळे एलएलएम पदवी मिळविण्याचे आमचे स्वप्न आणि संपूर्ण शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी शेरे यांनी दिली. पालघर, विरारसह विविध भागांतून अनेक विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते. काही उमेदवार नोकरी करणारे असून त्यांनी विशेष रजा घेऊन परीक्षेला हजेरी लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अनेकाना अडचणी आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांचे आरोप फेटाळले. विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची वेळ आधीच कळविण्यात आलेली असते. कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक वेळ समाविष्ट असतो. विद्यार्थ्यांनी वेळेत केंद्रावर पोहोचणे अपेक्षित आहे, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.