पुढारी ऑनलाईन डेस्क : वरळी हिट अँड रनप्रकरणी कोणालाही पाठीशी घातल जाणार नाही. दोषींच्यावर कडक कारवाई केली जाईल" असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केले. Worli Hit And Run
वरळी हिट अँड रनप्रकरणी कोणालाही पाठीशी घातल जाणार नाही.
हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे.
कायदा सर्वांना समानच आहे.
मुंबईमधील वरळीत हिट अँड रनची घटना. मासळी खरेदी करुन दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्याला बीएमडब्ल्यू कारने फरपटत नेले. यात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. गाडी शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांची असल्याच समोर आले आहे. या घटनेनंतर माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,
मुंबईत आज सकाळी घडलेल्या हिट अँड रनची घटना दुःखद, दुर्दैवी आहे. आपली पोलिसांशी चर्चा झाली आहे. यात राजकारण करण्याची अजिबात गरज नाही. जो कोणी दोषी असेल मग तो कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी असेल तरी देखील त्याला समान न्यायाने वागणूक दिली जाईल. या संदर्भात उद्धव ठाकरे गटातर्फे राजकारण सुरू असले तरी विरोधकांना दुसरे कामच राहिलेले नाही त्यांना त्यांचे काम करू द्या, मात्र या घटनेतील दोषींना नियमानुसारच कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात विमानतळावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
कायद्यासमोर सर्व समान आहेत. या घटनेला वेगळा न्याय दिला जाणार नाही. जे होईल ते कायदेशीरच होईल, कोणालाही पाठीशी घालण्याचा, कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करणार नाहीत. या घटना वारंवार होऊ नयेत यासाठी शासन म्हणून गृह विभाग नक्की उपाययोजना करेल. या केसमध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, जरी तो शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता असला तरी सर्वांना समान न्याय लागू करण्याचे काम आपले सरकार करणार आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे.
ज्या बीएमडब्ल्यू कारने कोळी दाम्पत्यला फरपटत नेले.ती कार शिंदे शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांची असुन कारमध्ये राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह आणि कारचालक होता. अपघातानंतर कार चालक फरार झाला होता. त्याला ताब्यात घेतले आहे.
मिहिर शाह हा अपघातानंतर आपल्या मित्रांकडे गेला होता. पोलिसांचे पथक मिहिरच्या मित्रांकडे गेले आहे. त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. दरम्यान मिहिर शाह आणि कारचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
अपघातामधील कार ही पालघरमधील शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांची आहे. अपघातानंतर राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गाडी कोण चालवत होते याचे उत्तर राजेश शाह यांनी कारचालक चालवत होता म्हटलं आहे. पण जखमींनी मिहिर शाह गाडी चालवत होता असल्याचे म्हटलं आहे.