

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा-वेळागर येथे ताज समूहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले पंचतारांकीत (५ स्टार) हॉटेल उभारले जाणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ठळक ओळख निर्माण होणार असून सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. या प्रकल्पासाठी पालकमंत्री नीतेश राणे यांनी विशेष पुढाकार घेतला असून त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
या प्रकल्पाबाबत पूरक करार पत्रावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक ताज समुहाच्या प्रतिनिधींसोबत पार पडली.
या बैठकीत हॉटेल उभारणीसाठी आवश्यक जमिनीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकरच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, स्थानिक ग्रामस्थ आणि ताज समूह यांच्यामध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या ग्रामस्थांच्या हिताचा विचार करून, त्यांना दोन टप्प्यांमध्ये मोबदला देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हा मोबदला जास्तीत जास्त एक ते दोन हप्त्यांत पूर्ण करावा आणि या जमिनीसंदर्भातील प्रलंबित असलेले सर्व कायदेशीर दावे (केसेस) मागे घेण्यात यावेत, अशा स्पष्ट सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीत प्रशासनाला व संबंधित प्रतिनिधींना दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभले असून ताज समूहासारख्या प्रतिष्ठित ब्रँडच्या आगमनामुळे येथील आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ वाढणार आहे. यामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर माजी मुख्यमंत्री व तत्कालीन पालकमंत्री खा. नारायण राणे यांनी ताज ग्रुपचे ५ स्टार हॉटेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री नीतेश राणे यांनी त्याबाबत पुढील पावले उचलली असून ताज हॉटेलच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देणारा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प शिरोडा वेळागर येथे साकारला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन अधिक सक्षम होईल व जिल्ह्याच्या अर्थकारणाला देखील अधिक चालना मिळेल, असा विश्वास यावेळी मंत्री राणे यांनी व्यक्त केला.
बैठकीला सावंतवाडी मतदारसंघाचे आ. दीपक केसरकर, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (ऑनलाईन), ताज समूहाचे वरिष्ठ प्रतिनिधी, पर्यअन विभागाचे अधिकारी आणि शिरोडा वेळागर ग्रामस्थ प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रकल्पाच्या कामाला लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने जिल्ह्याभरात आनंदाचे वातावरण आहे.
रोजगाराच्या संधी निर्माण होणार
या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असून स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे, तसेच पर्यटनाशी निगडीत व्यवसाय, स्थानिक हस्तकला, वाहतूक, हॉटेल व सेवा क्षेत्राला चालना मिळणार आहे. पंचतारांकीत हॉटेलमुळे उच्च दर्जाचे पर्यटक जिल्ह्याकडे आकर्षित होवून सिंधुदुर्गचा पर्यटन विकास नव्या उंचीवर पोहोचणार आहे.