मुंबई : गणपती विसर्जनावरून शिंदे गट आणि शिवसैनिक भिडले

मुंबई : गणपती विसर्जनावरून शिंदे गट आणि शिवसैनिक भिडले

मंबुई : पुढारी वृत्तसेवा  : गणपती विसर्जनावरून शिंदे गटातील बंडखोर आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिक भिडल्याची माहिती समोर आली आहे. सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याबाबत आमदार सदा सरवणकरांनी विचारले असता, यांनी या आरोपांचे खंडण केले आहे.

मुंबईत मागच्या कित्येक तासांपासून गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघत आहेत. दरम्यान यावेळी किरकोळ वादावादीचे प्रसंगही घडले; परंतु शिंदे गट आणि शिवसेना आमने-सामने आल्याने या वादाचे रुपांतर मोठ्या स्वरुपात होण्याची शक्यता होतीच. शुक्रवारी गणेश विसर्जन मिरवणूकीत, प्रभादेवीमध्ये शिंदे विरुद्ध शिवसेना गटात जोरदार राडा झाला. बंडखोर आमदार सदा सरवणकर विसर्जन मिरवणुकीवेळी मनसेच्या स्वागत कमानीमध्ये दिसून आल्याने यावरूनच वातावरण तंग होते. हा वाद शनिवारी आणखी टोकाला गेला.

शिंदे गटातील शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी मारहा‍ण केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, सदा सरवणकर यांनी दादर पोलीस स्थानकाच्या आवारात गोळीबार केला. या गोळीबारात पोलीस जखमी होता होता बचावला.

आमदार सुनिल शिंदेंचा गंभीर आरोप

मागील कित्येक वर्षांपासून शिवसेनेकडून गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी स्वागत कमान उभा केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वागत कक्ष उभारला गेला होता. पण शिंदे गटातील शाखा प्रमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हे सहन झाले नाही, असा आरोप सुनील शिंदे यांनी केला आहे. त्यावरुनच हा वाद झाला. शिवसेनेच्या नगरसेवकांना शिंदे गटाचे कार्यकर्ते नको त्या भाषेत बोलत असतात. त्यांना सत्तेचा माज आला आहे. सोशल मीडियावरही आक्षेपार्ह भाषा वापरली जात असल्याचंही सुनील शिंदे म्हणाले. यावेळी आपल्याजवळ असलेल्या पिस्तुलाचा गैरवापर सदा सरवणकर यांनी केल्याचंही सुनील शिंदे म्हणाले.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

दादर, प्रभादेवी, माहीम हे सुसंस्कृत मतदासंघ आहेत. अशा प्रकारच्या हाणामाऱ्या करायला हे काय बिहार राज्य नाही. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करावा आणि जे दोषी आहेत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी  मनसेचे  संदीप देशपांडे यांनी केली. . शिवसेनेने जे अडीच वर्षांत पेरलं, आता तेच उगवत असल्याचेही ते म्ह‍णाले. मनसे आंदोलनाच्यावेळी माझ्यावरही एका पोलीस भगिनीला धक्का मारल्याचा खोटा आरोप करून माझ्यावर खोटी केस दाखल करण्यात आल्याचीही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news