![महेश तपासे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F08%2F%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%87.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : गुवाहाटी येथील खोक्यांच्या चर्चेचे सत्य राज्यातील जनतेसमोर कधीच येऊ नये या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांनी आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्याशी चर्चा करुन समेट घडवून आणला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.
सुरतमार्गे गुवाहाटीतील खोक्यांचे सत्य जनतेसमोर येणे अपेक्षित होते मात्र ज्यापध्दतीने दोघांना गप्प बसण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यावरून काही काळ तरी जाईल मात्र खोक्यांचे सत्य एक दिवस जनतेसमोर नक्कीच येईल, असा विश्वासही महेश तपासे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती ही स्वाभिमानाच्या मुद्द्यावर झाली आहे. याची कल्पना खासदार सुजय विखे-पाटील यांना नसावी. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा हे पवार कुटुंब आहे. ते विखे कुटुंब नाही, असा टोलाही तपासे यांनी लगावला.
जे विखे-पाटील कुटुंब सत्तेसाठी इकडे तिकडे कुठल्याही पक्षात विलीन होते त्यांनी टीका करु नये, असे खडेबोल सुनावले. राष्ट्रवादी काँग्रेसवर, पवारसाहेबांवर राज्यातील तमाम जनतेचा, कास्तकार, मजूरांचा, महिला वर्गाचा, उद्योग क्षेत्रातील लोकांचा विश्वास आहे. सत्तेसाठी तडजोड राष्ट्रवादी किंवा पवारसाहेब करत नाही. पाच वर्षे सत्तेबाहेर राहिलो. आजही सत्तेबाहेर राहून झपाट्याने पक्षाची वाढ होत आहे हे कदाचित खासदार सुजय विखे-पाटील यांना माहित नसावे, असेही महेश तपासे म्हणाले.
हेही वाचा :