

Sharad Pawar on Dharmendra Pradhan resignation
मुंबई: "देशातील लोकशाहीने कात टाकली आहे आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय असल्याचे ते म्हणाले. तसेच, विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल त्यांनी विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे आभार मानले आहेत.
देशातील तरूणांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे की, जंतरमंतर आणि देशभरात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून मी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी काम केले आहे. एक मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदर्शी शिक्षण व्यवस्था हाच एका सशक्त राष्ट्राचा पाया असतो, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि रास्त अपेक्षांचा मी मनापासून आदर करतो. भारताच्या तरुण पिढीची स्वप्ने पूर्ण करणे ही राजकीय आणि सामाजिक जीवनातील आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी राहिली आहे. पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो," असे प्रधान म्हणाले.
"जंतरमंतर आणि देशभरात निर्माण झालेली परिस्थिती पाहता यात देशविरोधी शक्तींनी फायदा घेऊ नये, देशाची एकता अबाधित राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये आणि आपल्या मुलांनी अभ्यासावर व करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, या सर्व गोष्टींचा विचार करून मी पंतप्रधानांकडे माझा राजीनामा पाठवला आहे," असेही त्यांनी म्हटले आहे.
"अखेर सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आहे. हे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे मोठे यश आहे. या देशातील तरुण काय करू शकतात हे दाखवून दिले आहे. आपण सर्वांनीच शिक्षण क्षेत्राकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे," अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.