Sanjay Raut In India Defeat Pakistan In Asia Cup 2025 :
रविवारी झालेल्या आशिया कप २०२५ च्या पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतानं दणदणीत विजय मिळवला. मात्र या सामन्यापूर्वी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यावरून अनेक टीका झाल्या होत्या. दरम्यान, भारताच्या विजयानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत घणाघात चढवला.
संजय राऊत म्हणाले की, 'पाकिस्तान बरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रोह आहे. काल पाकिस्तान बरोबर भारत जिंकले त्याच्याबरोबर 25 महिलांचे कुंकू पुसलेले परत आले का... यात भरपाई काय झाली? ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानला घुसून मारण्याची संधी आली असताना भारतीय जनता पक्षाच्या सरकारने माघार घेतली.'
संजय राऊत यांनी कालच्या सामन्याबाबत शंका देखील उपस्थित केली. ते म्हणाले, 'क्रिकेटच्या मैदानावरती ती काय फिक्सिंगची मॅच होती. कालच्या सामन्यावर दीड लाख कोटी रूपयांचा जुगार खेळला गेला. यात पाकिस्तानला देखील पैसे मिळाले असतील, कालच्या सामन्यामुळं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान एक हजार कोटी रूपये मिळाले असतील.'
'तुम्ही पाकिस्तानला आमच्याविरूद्ध लढण्यासाठी, महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करत आहात. पाकिस्तान जिंकला हरला आम्हाला काय फरक पडत नाही. एकूण काय कालच्या सामन्यावरती दीड लाख कोटी रूपयांचं गँबलिंग झालं आहे. हे काय अमित शहा यांना कळत नाहीये. हे काय बीसीसीआयला कळत नाही.' असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर घणाघात चढवला.
संजय राऊत यांनी गावसकर यांचा दाखील दाखला दिला. राऊत म्हणाले, 'काल सुनिल गावसकर यांनी भारतीय संघांची खेळण्याची इच्छा नसली तरी संघाला खेळण्यास भाग पाडले आहे. सरकारनं जर खेळण्यास परवानगी दिली नसती तर भारतीय संघ खेळला नसता. हे सुनिल गावसकर यांच्यासारखा माजी खेळाडू सांगतोय.'