

मुंबई: गेल्या 54 दिवसांपासून समग्र शिक्षा अंतर्गत काम करणाऱ्या 3,378 कंत्राटी कर्मचाऱ्यांची शासन सेवेत कायम करण्याची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. समग्र शिक्षा संघर्ष समितीने आझाद मैदानात 9 मार्च 2026 पासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी आंदोलनाचा 54 वा दिवस होता.
कंत्राटी कर्मचारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या न्यायाच्या प्रतीक्षेत असून येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. समग्र शिक्षा अंतर्गत उर्वरित 3,378 कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करावे ही संघर्ष समितीची मागणी आहे.
समितीच्या अध्यक्षा योगिता बलाक्षे या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. मात्र; दीड महिना झाला तरी अद्याप यावर सरकारने निर्णय घेतलेल्या नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांचा विषय मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे.
यापूर्वी असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारने शासन सेवेत कायम केले आहे. पण, आमच्यावर अन्याय का?असा प्रश्न संघर्ष समितीकडून विचारला जात आहे. दरम्यान, सेवेत असताना 257 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत संघर्ष समितीचे सदस्य डॉ.केरबा कांबळे म्हणाले, मुंबईत परजिल्ह्यातून येणाऱ्या विशेषता महिला कंत्राटी कर्मचारी लेकरा- बाळासह या आंदोलनासाठी येतात. त्या आजारी पडत आहेत. त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. सरकारने याचा गांभीर्याने विचार करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना लवकर शासन सेवेत कायम करावे व आम्हाला न्याय द्यावा हीच सरकारकडे मागणी आहे.