

मुंबई: पूर्ववैमस्नातून समीर मुकदअली खान या 18 वर्षांच्या तरुणावर पाचजणांच्या एका टोळीने तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला. त्यात त्याच्या छातीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून शाहिद खान, शहजाद मणियार, अल्ताफ मणियार, उस्मान हुसैन आणि शाहबाज हुसैन या पाचही आरोपींना अटक केली आहे. याच गुन्ह्यांत ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहेत.
सुनाजीद मुकदअली खान हा तरुण साकीनाका परिसरात राहतो. त्याच्यासह त्याचा लहान भाऊ समीर हे संघर्षनगर परिसरात फळविक्रीचे काम करतात. काही दिवसांपूर्वी समीरचे शाहबाज आणि उस्मानशी क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते.
रविवारी काम संपल्यानंतर सुनाजीद हा घरी गेला होता.यावेळी त्याला समीरचा फोन आला. त्याने त्याला काही लोक मारहाण करत असल्याचे सांगितले. त्यामुळे सुनाजीद तिथे गेला. मात्र तिथे कोणीही नव्हते.
याच दरम्यान त्याला अल्फैज शेख याचा कॉल आला. त्याने समीरवर चाकूने हल्ला झाला असून त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले.
तिथे गेल्यानंतर त्याला शाहिद खान, शहजाद मणियार, अल्ताफ मणियार, उस्मान हुसैन आणि शाहबाज हुसैन यांनी समीरवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याचे समजले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली.