

मुंबई: अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या 5 लाख 74 हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल 2 लाख 48 हजार विद्यार्थ्यांनी अजूनही आपले प्रवेश महाविद्यालयात जाऊन निश्चित केलेले नाहीत.
पहिल्या यादीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी आज, बुधवारी शेवटची संधी असून आतापर्यंत 3 लाख 26 हजार 870 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. आता शेवटच्या दिवशी किती विद्यार्थी महाविद्यालयांत जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करतात, याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.
शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात 21 लाख 98 हजार 666 जागा उपलब्ध आहेत. मुंबई विभागातच चार लाख 77 हजार 210 जागा उपलब्ध आहेत.
राज्यभरातील 12 लाख 51 हजार 259 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी आठ लाख 87 हजार 264 विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक करून प्रवेश प्रक्रियेत अंतिम सहभाग नोंदविला होता. यातील पाच लाख 74 हजार 945 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळाले.
मुंबई विभागात दोन लाख 12 हजार 917 विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले होते. त्यापैकी एक लाख 33 हजार 323 विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत महाविद्यालयाचे वाटप झाले आहे. मात्र प्रवेश निश्चित करण्याच्या प्रक्रियेत अनेक विद्यार्थी अद्याप मागे असल्याने पुढील फेऱ्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यभरात नियमित प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन लाख 396 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्याशिवाय व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा आदी माध्यमांतून 26 हजार 474 प्रवेश झाले आहेत.
अशा प्रकारे एकूण प्रवेशसंख्या तीन लाख 26 हजार 870 इतकी झाली आहे. म्हणजेच पहिल्या यादीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे 2 लाख 48 हजार विद्यार्थी अजूनही प्रवेश निश्चित करण्यापासून दूर आहेत.