मुंबई : अकोला पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई टोळीकडून पुन्हा एकदा जीवे मारण्याची आणि १० कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी आल्यानंतर महाराष्ट्र पोलीस हाय अलर्ट मोडवर असून बिश्नोई टोळीच्या हालचालींवर करडी नजर ठेवली आहे.
'पैशांची व्यवस्था कर, नाहीतर बाबा सिद्दीकींसारखा गेम करू, आता फोन नाही थेट गोळी येईल" अशी शेवटची चेतावणी देणारा कॉल बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकर याच्याकडून आला होता. हा कॉल आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून (कॅनडा किंवा अमेरिका) आल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटल्यानंतर पोलिसांनी विशेष सर्च ऑपरेशन सुरू केले असून बिश्नोई गँगच्या नेटवर्कवर पाळत ठेवली आहे.
तसेच बिश्नोई गँगच्या स्थानिक हस्तकांचा शोध घेत आहेत. शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातीलच असल्याने, स्थानिक पातळीवर त्याचे काही संपर्क आहेत का, यादृष्टीने मुंबई पोलीस आणि अकोला पोलीस संयुक्तपणे कारवाई करत आहेत. त्याचबरोबर धमकीच्या ऑडिओ क्लिपची आणि ज्या आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल आले आहेत, त्यांच्या आयपी अॅड्रेसची तांत्रिक तपासणी सायबर पोलिसांकडून वेगाने सुरू आहे.
बिश्नोई टोळीचा म्होरक्या शुभम लोणकर
शुभम लोणकर हा कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीत आहे. तो या बिश्नोई गँगचा महाराष्ट्रातील एक मुख्य म्होरक्या आणि सक्रिय सदस्य म्हणून काम करतो. शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी असून नंतर तो पुण्यात स्थायिक झाला होता.
२०१५-२०१९ च्या सुमारास राजस्थानमधील लष्कर भरती प्रक्रियेदरम्यान तो बिश्नोई टोळीच्या संपर्कात आला आणि त्यात सामील झाला. ऑक्टोबर २०२४ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडात मुख्य सूत्रधार म्हणून त्याचे नाव समोर आले होते. या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्याची फेसबुक पोस्ट शुभम लोणकरच्या सोशल मीडिया अकाउंटवरूनच करण्यात आली होती.
चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात देखील मुंबई पोलिसांनी शुभम लोणकरला मुख्य आरोपी म्हणून घोषित केले आहे. सध्या तो भारतातून फरार असून, बिश्नोई टोळीच्या नावाचा वापर करून महाराष्ट्रात स्वतःची नवीन टोळी उभी करण्याचा त्याचा प्लॅन असल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.