मुंबई : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी क्लीन चीट दिल्याची माहिती आता समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने गैरसमजुतीतून रविंद्र वायकर यांच्या विरोधात तक्रार दिल्याचे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केलेल्या सी समरी रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
वायकर यांच्या सोबतच त्यांच्या पत्नी मनीषा वायकर, आर्किटेक्ट अरुण दुबे, आसू नेहलानी, प्रीथपाल बिंद्रा, राज लालचंदानी यांना देखील सहआरोपी करण्यात आले होते. मात्र आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात रवींद्र वायकर यांना क्लीन चीट दिल्याने या सर्वांवरील गुन्हे मागे घेत असल्याचे मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी साधारण डिसेंबर महिन्याच्या अखेरीस भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रविंद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी इथे भूखंड घोटाळा केल्याचा आरोप केला. तेव्हा रवींद्र वायकर हे शिवसेना ठाकरे गटात होते. यात किरीट सोमय्या यांनी म्हटले होते की, ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीच्या भूखंडावर रवींद्र वायकर यांनी फाइव स्टार हॉटेल बांधण्याचा प्रयत्न केला. यातून जवळपास ५०० कोटींचा घोटाळा वायकर यांनी केला.
रवींद्र वायकर यांच्या या प्रकारामुळे पालिकेचा महसूल बुडाल्याचे देखील किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरुन बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियंता संतोष मांडवकर यांनी आझाद मैदान पोलीस स्थानकात तक्रार दिली. या प्रकरणावर आता मुंबई पोलिसांनी रवींद्र वायकर यांना क्लीन चिट दिली आहे.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला असला तरी, पोलिसांनी पालिकेवरच गैरसमजुतीतून गुन्हा दाखल केल्याचा ठपका ठेवल्याने यावर आता पालिका नेमकी काय भूमिका घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.