

Raj Thackeray On NEET Paper Leak: NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. "केंद्र सरकारची प्रत्येक विषयात गोंधळ घालून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याची परंपरा सुरूच आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या पेपरफुटीचे जाळे देशव्यापी असून, यामध्ये मोठ्या कोचिंग क्लासेसचाही हात असल्याचे त्यांनी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले.
राज ठाकरे यांनी २०१६ पासूनच 'NEET' परीक्षेला असलेल्या विरोधाचा पुनरुच्चार केला. "एकछत्री अंमल गाजवण्याच्या केंद्र सरकारच्या खुमखुमीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला आहे. या पद्धतीमुळे केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांचेच फावते आणि सामान्य घरातील मुले भरडली जातात," असे ते म्हणाले. दक्षिणेतील राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही आता NEET विरोधात ठाम भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
"उत्तर भारतातील कोचिंग क्लासेसचे जाळे आणि तेथील वर्चस्व लक्षात घेता, दक्षिणेतील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या संधी हिरावून घेण्याचा हा अट्टाहास आहे," असा गंभीर आरोपही त्यांनी केला. या सर्व गोंधळाला जबाबदार धरत, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
राज्य सरकारलाही सुनावताना राज ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्र सरकारने आता पाठीचा कणा ताठ दाखवून केंद्राच्या निर्णयाला आंधळेपणाने हो म्हणणे थांबवले पाहिजे. पेट्रोल-डिझेल बचतीसारख्या इव्हेन्टमधून बाहेर पडून सरकारने महाराष्ट्रातील मुलांच्या मेडिकल प्रवेशासाठी ठोस भूमिका घ्यावी."
२२ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलेले असताना सरकार केवळ सीबीआय चौकशीच्या नावाखाली वेळ मारून नेत असल्याची टीकाही त्यांनी केली. NEET ही परीक्षाच मुळात विद्यार्थ्यांच्या हिताची नसल्याचे सांगत, राज्य स्तरावरील प्रवेश प्रक्रियाच योग्य असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.