

मुंबई : आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. तुम्हला एकाही प्रश्नाचे उत्तर देता येत नसेल तर तुमचा काय उपयोग आहे अशा शब्दात निवडणूक आयोगावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निशाणा साधला. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांची घोषणा केली आहे.
पुढे ते आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणतात की दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ? असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.
मतदारांनो हा तुमचा अपमान
महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल... असे राज ठाकरे यांनी म्हटले असून ही निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप शेअर केली आहे. दरम्यान बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन... असे म्हणून यावेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांचे कौतुकही केले आहे.
कोण जिंकणार हे आधीच फिक्स?
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी सत्याचा मोर्चाचे आयोजन करुन महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठवले होते. यावेळी मतदान याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नये अशी मागणी या नेत्यांनी केली होती. तसेच मनसेचय पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी आयोगावर टिकास्त्र सोडले होते. ईव्हीएमच्या माध्यमातून कोण जिंकणार हे आधीच फिक्स केले जाते. तशा युक्त्या वापरून प्रोग्रामिंग केले जाते. तर दुसरीकडे मतदार यादीतील घोळ आहेतच. काही गोष्टी लपवून, मतदार याद्यांतील गोंधळ कायम ठेवून निवडणुका घेण्याचा विचार म्हणजेच मॅच फिक्सिंग असल्याचा मेळाव्यात केला होता.