

Raj Thackeray on Mumbra Train Accident Mumbai Migration Issue
मुंबई: मुंबईत आज जो रेल्वे अपघात झाला तो दुर्दैवी आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, पण अशाच घटना रोज मुंबईत घडत आहेत. मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं-घेणं नाही. प्रत्येक शहरात ट्रॅफिकची गंभीर समस्या आहे. नवनवीन रस्ते, मेट्रो बांधून काहीही फरक पडत नाही. तरीही कुठलंच सरकार शहर नियोजनाचा किंवा बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचा विचार करत नाही, असा निशाणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून सरकारवर साधला.
ते पुढे म्हणाले की, मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे. आम्ही सुद्धा ही मागणी केली होती, पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलेले नाही. आज शहरांचे नियोजन पूर्णपणे विस्कटलेले आहे. प्रचंड लोंढे येत आहेत. त्यांच्यासाठी मोठे रस्ते, ब्रिज, मेट्रो बांधली जात आहेत. उंच उंच इमारतींना परवानगी दिली जात आहे, पण पार्किंगचे काहीही नियोजन नाही. आपले सगळे लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचार यावरच केंद्रित आहे.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती करणार का? या प्रश्नापेक्षा आज मुंबईत प्रवास कसा होतोय, शहरांमध्ये आणि एकूणच राज्यात लोकं कशा अवस्थेत जगत आहेत, हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. माध्यमे हे प्रश्न उपस्थित करणार आहेत का? सरकारांना या प्रश्नांची उत्तरे मागणार आहेत का ? कोणकोणाशी युती होणार, कोण काय म्हणाला, हे सगळं खरोखरच या गंभीर प्रश्नांपुढे क्षुल्लक आहे.
मी स्वतः मुंबईत रेल्वेने बराच काळ प्रवास केला आहे. पण तेव्हा परिस्थिती थोडी बरी होती. आता रेल्वे स्टेशनवरची गर्दी पाहून धडकी भरते. हे खासदार, आमदार, मंत्री परदेशात जातात. तिथून काही शिकून येतात का? परदेशात अशी घटना घडली असती, तर तिथे ती कशी हाताळली गेली असती? आपल्याकडे मात्र काहीही नाही. इथे माणसाच्या जीवाला किंमतच नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
रेल्वेमध्ये एवढी गर्दी असते का? स्टेशन आले तरी उतरता येत नाही, सरळ पुढल्या स्टेशनला जाऊन पोहोचतो. त्यामुळे चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी दोन दरवाजे ठेवणे आवश्यक असताना याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्र्यांनी राजानीमा देण्याची मागणी होत आहे. परंतु त्यांनी राजीनामा न देता मुंबईत येऊन त्यांनी पाहणी करावी. मुंबईतीव लोक प्रवास कसा करतात, हे त्यांनी येईन पाहावे, असे राज ठाकरे म्हणाले.