पुढारी ऑनलाईन: आजपासून पुढील चार दिवस दक्षिण कोकण किनारपट्टीसह, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी ५ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती आएएमडी पुणे विभागाचे प्रमुख डॉ. के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे.
दरम्यान आयएमडी मुंबईने आज दिलेल्या बुलेटिननुसार, ३ जुलै- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा कोल्हापूर, ४ जुलै- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सातारा ५ जुलै- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सातारा आणि ५ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंट अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान. विदर्भातील काही जिल्ह्यांना ३ जुलै रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात हलक्या-मध्यम पावसाची शक्यता, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, असे आयएमडी मुंबई आणि आयएमडी नागपूरने म्हटले आहे, अशी माहिती डॉ. के.एस.होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे.
नैऋत्य मान्सूनने आता संपूर्ण भारत व्यापला आहे, ही आनंदवार्ता भारतीय हवामान विभाग, पुणेचे विभागप्रमुख डॉ. के. होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आज (दि.२ जुलै) दिली. मान्सून संपूर्ण भारत व्यापण्यासाठी दरवर्षी साधारण ८ जुलैपर्यंत वाट पाहावी लागते, मात्र यंदा ६ दिवसआधीच रविवारी २ जुलै रोजी मान्सूनने (Monsoon Update) संपूर्ण भारत व्यापला आहे, अशी माहिती डॉ. के. होसाळीकर यांनी दिली आहे.