

मुंबई : मुंबईत या वर्षी पाणी तुंबणार नाही, असा शब्द महापालिका आयुक्तांनी मुंबईकरांना दिला आहे. मात्र मान्सूनपूर्व कामाचा फज्जा उडाल्याचा पंचनामा खुद्द सभागृहनेते गणेश खणकर यांनीच गुरुवारी केला. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे यंदा मुंबईकरांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली असून ही मुंबई कंत्राटदार चालविणार नाहीत, असे खडेबोलही त्यांनी प्रशासनाला सुनावले आहे.
खणकर यांनी यावेळी, १०० टक्के नालेसफाईचा दावा खोडून काढला. शहरातील महत्त्वाचे मोठे नाले आणि उपनगरांमधील मिठी नदी, पोईसर, ओशिवरा व दहिसर या नद्यांच्या पात्रात अजूनही मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असल्याचे सांगितले. 'फ्लडिंग पॉइंट्स वरील पाण्याचा निचरा करण्यासाठी बसवण्यात आलेले हाय कॅपॅसिटी पंप अजूनही पूर्ण क्षमतेने कार्यरत केलेले नाहीत.
रेल्वे रुळांखालील कल्व्हर्ट्स आणि गृहनिर्माण सोसायट्यांच्या बाजूने जाणाऱ्या लहान नाल्यांची सफाई पूर्ण झालेली नाही. रेल्वे आणि पालिकेमध्ये समन्वय नसल्यामुळे रेल्वेमार्ग पाण्याखाली जाण्याची आणि लोकल सेवा ठप्प होण्याची दाट शक्यता यावेळी व्यक्त केली. प्रत्येक प्रभागातील नालेसफाईच्या कामाचे त्रयस्थ संस्थेकडून तात्काळ 'ऑन-स्पॉट' ऑडिट करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
मिठी नदी सफाईसाठी करोडो रूपये खर्च होतात. तरीसुद्धा मिठीची स्वच्छता होत नाही. यावर्षी मिठी नदीचे कंत्राट कुणाले दिले. मुंबईकरांना किती वेळा फसविणार आहात, पाणी तुंबल्यावर यावर्षी कुणाला सोडणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी यावेळी कंत्राटदारांना दिला. आम्ही अंधेरी सबवे पाहणीसाठी गेलो असता, एका कंत्राटदाराचा सुपरवाझर चक्क गुटखा खाऊन आमच्या समोर येऊन बोलतो. यामुळे आता बस झाले, ही मुंबई कंत्राटदार चालविणार नाही. आम्ही निवडून आलेले नगरसेवक चालविणार, असा इशारा शेवटी त्यांनी दिला.
खणकर यांच्या या भूमिकेमुळे सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांनाही नाले सफाईचे वाभाडे काढले. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईत कंत्राटदारांना मेळावा भरला आहे. ठराविक जिल्ह्याचे कंत्राटदार नाले सफाईच्या कामात आहेत.
यामुळे प्रशासनाने यावर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली. एमआयएमचे पक्षातील गटनेते विजय उबाळे यांनी नाले सफाई कामांची पोलखोल केली. सभागृहात नाले सफाई कामाचे फोटो व्हिडीओ थेट पालिका महापौर आणि अतिरिक्त आयुक्त यांना दाखविले.
नालेसाफसफाईच्या कामाचे त्रयस्थ पक्षाकडून ऑडिट करण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे. याशिवाय, या कामात अधिक पारदर्शकता आणि परिणामकारकता आणण्यावर तसेच काही विशिष्ट कंत्राटदारांची मक्तेदारी मोडून काढण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. मिठी नदी स्वच्छ करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदारांवर जुने गट दबाव टाकत आहेत.
अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका