पुढारी ऑनलाईन डेस्क : सीमाप्रश्नावरून सध्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत (शिवसेना शिंदे गट) यांच्यात ट्विटरवरून शाब्दिक चकमक रंगली आहे. आमदार रोहित पवार यांच्या बेळगाव दौ-यावर उदय सामंत यांनी ट्विटरवरून टीका केली. त्याला आमदार रोहित पवार यांनी पलटवार करत ट्विट केले. वाचा कोण कोणाला काय म्हणाले…
गेले काही दिवस कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन महाराष्ट्रात वातावरण चांगलचं तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाप्रश्नावर केलेल्या विधानांमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर दोन्ही राज्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यभर या वादाचे पडसाद उमटत आहेत. काल मंगळवारी (दि.१३) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रोहित पवार हे अचानक बेळगावला गेले. तिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. त्याचबरोबर सीमा लढ्यातील ज्येष्ठ नेतृत्व, महाराष्ट्र एकीकरण समितीचे मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांचीही भेट घेतली.
रोहित पवारांच्या दौऱ्यानंतर शिंदे गटातील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वक्तव्य केले की, "सत्यनारायणाच्या पूजेला जायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या एखाद्या पुतळ्याला नमस्कार करुन यायचं. असा कुठला दौरा असतो का? मला असं वाटतं की तिथे जायचं असेल तर ताठ मानेने मी येतोय, असं सांगून जायचं. आम्ही जाताना असं सांगून जावू" सामंताच्या या वक्तव्याला रोहित पवार यांनी पलटवार केला आहे.
त्यांनी उदय सामंतांना टॅग करत ट्विट केले आहे की, "साहेब, किमान सत्यनारायणाचा उल्लेख करताना तरी सत्य बोला, तुम्ही माझे जुने मित्रच आहात, पण नव्या संगतीचा इतका लवकर परिणाम बरा नाही. मराठी अस्मितेशी संबंधित बेळगावविषयी आपणास विस्तृतपणे सांगितले असते, परंतु आपले वक्तव्य ऐकूण हा विषय आपल्या आवाक्याबाहेरचा वाटतो, क्षमस्व! "