Mumbai Ahmedabad Highway
पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवण घाटातील अपघातांची मालिका रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 'पुढारी न्यूज'ने या संदर्भातील वृत्त प्रसारित केल्यानंतर, प्राधिकरणाने या अपघातप्रवण क्षेत्रातील १०० किमी/तास वेगमर्यादेचे फलक हटवून आता ५० किमी/तास वेगमर्यादेचे नवीन फलक लावले आहेत.
मेंढवण घाट परिसरात गेल्या वर्षभरात साधारणतः ४५ अपघात झाले असून, दुर्दैवाने त्यात ४९ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा संपूर्ण परिसर घाट विभागाचा असून येथे अनेक ठिकाणी तीव्र उतार आणि धोकादायक वळणे आहेत, ज्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. महामार्गावर 'व्हाईट टॉपिंग'चे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरात वेगमर्यादा वाढवण्याचे (१०० किमी/तास) फलक बसवण्यात आले होते. मात्र, 'पुढारी न्यूज'ने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने तत्काळ दखल घेत कंत्राटदाराला ते फलक हटवण्याचे आदेश दिले.
अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने आता या ठिकाणी ताशी ५० किलोमीटर वेगमर्यादा पाळण्याचे आवाहन वाहनचालकांना केले आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता या भागातील अपघातांच्या संख्येत घट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.