

Sanjay Raut
मुंबई: दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ऑपरेशन टायगरच्या कुजबुज सुरू आहे. ठाकरेंच्या खासदारांशी शिंदेंच्या नेत्यांनी या अगोदरच संपर्क केल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर मंत्री उदय सामंत, माजी खासदार राहुल शेवाळे राजधानीच्या दौऱ्यावर आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातच एक वेगळं ॲापरेशन सुरू असल्याचा दावा केला आहे.
दिल्लीत गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे शिंदे यांच ऑपरेशन टायगर यशस्वी ठरलं तर शिंदेच्या खासदारांच्या संख्येत मोठी वाढ होऊन ही संख्या भाजपपेक्षा अधिक होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात सुरू आहे.
आज (दि. १८) दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "ऑपरेशन टायगर करणाऱ्यांनी दिल्लीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. आतापर्यंत दिल्लीमध्ये जे लोक ऑपरेशन करायला आले ते निर्वस्त्र होऊन गेले. दिल्ली कोणा एकट्याची नाही, इथेून प्रत्येकाला जावं लागतं. दिल्लीत एकनाथ शिंदे नेहमीच येत असतात. हा पक्ष भाजपचे अंगवस्त्र आहे. सत्ता, पैसे आणि तपास यंत्रणांचा गैरवापर करून अमिष दाखवण्याचे काम केले जाते. त्यातून ॲापरेशन टायगर राबवले जाते. मात्र, सध्या शिंदेंच्याच गटात वेगळ्या गटाकडून ॲापरेशनचं काम सुरू आहे. त्याची सूत्रं दिल्लीतून चालविली जात आहेत. आमचे ९ खासदार चार दिवसांपूर्वी बैठकीला आले होते," असे राऊत म्हणाले.
देशात विरोधी पक्षाच्या खासदारांना निधी दिला जात नाही. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारने प्रशानाला विरोधी आमदारांची कामे करू नयेत, अशा सुचना दिल्या आहेत. सरकारकडून खासदार आणि आमदारांची कोंडी केली जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.