

मुंबई : ओबीसी समाजाच्या हिताचा कोणताही निर्णय ओबीसी कल्याण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला नाही.त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा व सरकारने ही उपसमिती तात्काळ बरखास्त करावी अशीओबीसी जनमोर्चाची मागणी असल्याचे जनमोर्चा अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत शुक्रवारी सांगितले.ओबीसी जनमोर्चाची राज्यस्तरिय बैठक मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झाली.या बैठकीनंतर ते बोलत होते.
यावेळी कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर,जे. डी. तांडेल,दशरथ दादा पाटील, लक्ष्मण गायकवाड, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, अनिल नवगणे, विलारा काळे, मृणाल डोले-पाटील, पांडुरंग मेरगळ, रमेश पिसे, पक म्हात्रे, आदी उपस्थित होते.
यावेळी प्रकाश शेंडगे म्हणाले,ओबीसी हा प्रवर्ग आहे.या प्रवर्गामध्ये राज्यामध्ये साडेचारशे जातींचा समावेश आहे.पण;या प्रवर्गाचे आरक्षण दिवसाढवळ्या सरकार काढून घेत आहे.राज्यात सुमारे ६० टक्के ओबीसी समाज आहे.या समाजाच्या कल्याणासाठी सरकारने महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी कल्याण मंत्रीमंडळ उपसमिती तयार केली.
मंडल संघर्ष यात्रा १ ऑगस्टपासून
मंडल आयोगाची स्थापना होऊन यावर्षी ४७ वर्षे होतात. यानिमित्त १ ऑगस्ट २०२६पासून चौंडी (जि.अहिल्यानगर) येथून मंडल संघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे.त्यानंतर ही यात्रा विविध जिल्हयात फिरुन ७ ऑगस्टला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात जाईल. त्याठिकाणी या यात्रेचे रुपांतर सभेमध्ये होईल. या सभेनंतर यात्रेचा समारोप होणार असल्याचे प्रकाश शेंडगे यावेळी म्हणाले.