

मुंबई: नीट यूजी परीक्षेच्या पेपर फुटीनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) २१ जून रोजी होत असलेल्या पुनर्परीक्षेबाबत मोठी खबरदारी घेतली आहे. नीट परीक्षेबाबत समाज माध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या अफवा, प्रश्नपत्रिका फुटल्याचे दावे आणि विविध प्रकारच्या गैरप्रकाराला आळा घालण्यास एनटीएने विशेष तक्रार नोंदणी पोर्टल सुरू केले आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक, कोचिंग संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांना परीक्षेदरम्यान घडणाऱ्या गैरप्रकारची माहिती माहिती एनटीएला देणे शक्य होणार आहे.
सार्वजनिक परीक्षांची पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता कायम राखण्याच्या उद्देशाने एनटीएने हा उपक्रम हाती घेतला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिका बेकायदेशीर असल्याचा दावा करणारे संकेतस्थळ, समाज माध्यमे किंवा मेसेजिंग चॅनेल्सवर देण्यात येणारी माहिती, पैसे घेऊन प्रश्नपत्रिका, पेपर फुटल्याची माहिती किंवा हमखास यश मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या व्यक्ती अथवा गटांविरोधातही विद्यार्थी व पालकांना तक्रार नोंदविता येणार आहे.
त्याचप्रमाणे एनटीए अधिकारी, परीक्षा कर्मचारी किंवा सरकारी प्रतिनिधी असल्याचे खोटे भासवणाऱ्या व्यक्तींबाबतची माहिती देखील नागरिकांना या पोर्टलवर देता येणार आहे. याशिवाय विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीती किंवा संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने पसरविण्यात येणाऱ्या कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या अथवा फसव्या माहितीची नोंदही करता येणार आहे. तसेच केंद्र सरकारशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या माहितीची तक्रार पीआयबी फॅक्ट चेककडे व्हॉट्सॲप हेल्पलाइन किंवा ई-मेलद्वारेही विद्यार्थ्यांना करता येणार आहे.