पुढारी ऑनलाईन डेस्क : वंदे मातरम् म्हणण्याबाबत कुणालाही आक्षेप नाही. परंतु महागाई, जीएसटी, बेरोजगारी, गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल दरवाढ हेही विषय महत्त्वाचे आहेत. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर आधी बोला, महत्त्वाचे प्रश्न सोडून वेगळ्याच मुद्द्यावर चर्चा केली जात आहे, असा निशाणा राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी भाजपवर साधला. राज्यातील शिंदे सरकार लोकशाही मार्गाने स्थापन झालेले नाही, असेही पवार म्हणाले.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारी (दि.१७) पासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी अधिवेशनातील रणनीतीबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाले आहेत. राज्यातील पूर परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही तिप्पट मदत शेतकऱ्यांना केली. परंतु सरकारने तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. याबाबत अधिवेशनात आवाज उठविला जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?