

मुंबई: नेपाळच्या महाप्रलयाचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरुंची संख्या ४०५ पर्यंत पोहोचली असून रिचा टूर्स प्रा. लि. या संस्थेमार्फत गेलेल्या ६० नागरिकांच्या गटाशी अद्याप थेट संपर्क प्रस्थापित झालेला नाही. हे सर्वजण मुंबईतील हिल्स ॲण्ड ट्रेल्सच्या नेतृत्वात यात्रेला गेले. त्याचे नेतृत्व करणारे डॉ. मिलिंद चितळे दाम्पत्यही बेपत्ता आहे.
राज्यातील २६२ नागरिकांना स्वगृही आणण्यासाठी यशस्वी कार्यवाही होत असून उर्वरित ७६ यात्रेकरू संपर्कात असून सुरक्षित आहेत. अन्य ७ नागरिकांची लिंकद्वारे नोंद झाली असून त्यांच्याशीही अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. या व्यक्तींचा ठावठिकाणा व माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पर्यटकांच्या शोधासाठी केंद्र सरकारचे विशेष पथक काठमांडू येथे दाखल झाले आहे. भारताचे नेपाळमधील राजदूत यांनीदेखील या पथकाची भेट घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनांनुसार प्रवासातील अडचणी दूर करण्याबरोबरच विविध प्रकारची मदत उपलब्ध केली आहे.
राज्यातील आणखी ६९ नागरिकदेखील पुढील प्रवास करून मुंबईत पोहोचतील. यापूर्वी तिबेटमधील मानसरोवरजवळील सागा येथून ३७ नागरिक २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी मुंबईत सुखरूप पोहोचले आहेत.