

मुंबई: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्रिक्षण कार्यक्रमातंर्गत (एसआयआर) मतदार पडताळणीत मयत, दुबार, कायमचे स्थलांतरित, गैरहजर आणि गणना अर्जांवर सही करण्यास नकार दिलेल्या अशा तब्बल ३६ लाख ८हजार ९२२ मतदारांची नावे मुंबईच्या मतदारयादीतून रद्द करण्यात आली आहेत.
राज्यातही जुन्या मतदार यादीतील २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांची म्हणजे २१.१४ टक्के नावे ही प्रारूप यादीत वगळली गेली आहेत.
आता ज्यांची नावे वगळली गेली आहेत, त्यांना आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
मतदार पडताळणीनंतर मुंबई शहरची १६ लाख ४ हजार ७७९ व मुंबई उपनगरची ५१ लाख ७१ हजार ८०९ मतदारांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिध्द करण्यात आली.
या पडताळणीचा मोठा फटका मुंबई शहरापेक्षा मुंबई उपनगराला बसला. मुंबई शहरात ९ लाख ५० हजार ७२० मतदार बाद झाले, तर मुंबई उपनगरात २६ लाख ५८ हजार २०२ मतदार यादीबाहेर फेकले गेले आहेत.
राज्यात वगळण्यात आलेल्या नावांमध्ये सुमारे १७ लाख मतदार दुबार असल्याने त्यांची नावे एकाच ठिकाणी नोंद झाली असून त्यांचा समावेश प्रारूप यादीत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात वगळल्या गेलेल्या मतदारांची संख्या १ कोटी ९० लाख आहे.
याशिवाय सुमारे ३४ लाख मतदारांचे मृत्यू झाल्याने त्यांची नावेही वगळली गेली आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात १ कोटी ५६ लाख मतदार वगळले गेले आहेत. यातील जे पात्र मतदार आहेत, त्यांना पुन्हा नाव नोंदवण्याची संधी असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी सांगितले.
प्रारूप यादीवर मंगळवार दि.१ सप्टेंबरपासून हरकत, दावे करता येणार आहेत. याबरोबर नव्याने मतदार नोंदणीसाठी मतदारांना अर्जही करता येणार आहे.
प्रारूप मतदार यादीत समावेश नसलेल्या व योग्य पुरावे असलेल्या मतदारांना त्यांनी योग्य पुरावे सादर केल्यानंतरच त्यांची नावे अंतिम मतदार यादीत समावेश केली जाणार आहेत. अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द केली जाणार आहे.
३० जून ते १७ ऑगस्ट या कालावधीत एसआयआरची प्रक्रिया झाली. सर्व मतदारांना मतदान गणना अर्जाचे वाटप करून ते त्यांच्याकडून भरून घेण्यात आले. जमा झालेल्या अर्जांचे निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर स्कॅनिंग करण्यात आले.
४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी
प्रारूप यादीतील २००२-२००४ च्या मतदार यादीशी जुळवणी न झालेले मतदार तसेच तार्किक विसंगती आढळलेले मतदार यांना संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटिसा बजावण्यात येणार आहेत. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांची पडताळणी करून निर्णय घेतला जाणार आहे. दावे, हरकती आणि नोटिसांवरील कार्यवाही २९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.