

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये लावलेल्या लिटल बिन्स काही ठिकाणी कचराकुंड्या बनल्या आहे तर काही ठिकाणी त्या चोरील्या गेल्याचेही निदर्शनास आले आहे. महापालिका क्षेत्रात जवळपास 500 पेक्षा अधिक लिटल बिन्स रस्त्याच्या बाजुला बसवल्या आहेत. मात्र काही नागरिक त्यामध्ये घरातील कचरा आणून टाकत त्या फुल करत आहेत. त्यामुळे सुज्ञ नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नवी मुंबई शहर स्वच्छ राहवे यासाठी महापालिकेने विविध योजना राबवल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांंनी कचरा करुन घाण करु नये यासाठी महापालिकेने शहरात सार्वजनिक विविध ठिकाणी 500 पेक्षा अधिक लिटल बिन्स बसवल्या. महापालिकेने कचराकुंडीमुक्त शहर बनवण्यासाठी कचराकुंड्या हटवल्या आहेत.
रस्त्याने जात येत असताना किरकोळ कचरा टाकण्यासाठी लिटल बिन्स बसवलेल्या असताना या लिटल बिन्समध्ये घरातील कचरा आणून टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी लावलेल्या लिटल बिन्स गर्दुल्ल्यांकडून चोरण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे महापालिचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे.
शहरात काही ठिकाणी लिटल बिन्स गर्दुल्ल्यांकडून चोरण्याचे प्रकार घडले आहेत. सार्वजनिक ठिकाणी कचरा होऊ नये यासाठी लिटल बिन्स बसवलेल्या असताना घराजवळ असणाऱ्या लिटंल बिन्समध्ये घरातील मोठा कचरा आणून टाकला जात आहे. त्यामुळे या लिटल बिन्स तत्काळ भरतात, असे मनपाच्या एका स्वच्छता अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
उद्देशालाच हरताळ
रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी रस्त्यात कचरा टाकून घाण करु नये. तसेच तो कचरा एकाच ठिकाणी रहावा यासाठी शहरात महापालिकेने लिटलबीन्स बसवल्या आहेत. पण कचराकुंडीमुक्त शहर अशी ओळख असलेल्या शहरात लीटल बीन्स हीच कचराकुंडी समजून त्यात कचरा आणून टाकला जात आहे.