

Navi Mumbai APMC
नवी मुंबई: नवी मुंबईतील एपीएमसी फळ मार्केटमध्ये आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईत विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता हा प्रकार समोर आल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
एपीएमसी मार्केटमध्ये काही व्यापाऱ्यांकडून उघडपणे आंब्यांवर रसायनांची फवारणी केली जात असल्याने, बाजार समितीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. "असे रासायनिक आंबे तुम्ही तुमच्या मुलांना खायला द्याल का?" असा जाब घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी विचारला असता, संबंधित व्यापाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.
या प्रकाराची माहिती मिळताच एपीएमसी प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने संयुक्त मोहीम राबवून कारवाई सुरू केली आहे. पथकाद्वारे संशयास्पद ठिकाणांहून आंब्याचे नमुने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी व्यापाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या घटनेमुळे बाजारात मिळणाऱ्या फळांचा दर्जा आणि सर्वसामान्यांचे आरोग्य यांबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे.