

मुंबई: मराठा समाजाला ओबीसी या प्रवर्गातून आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय मराठा पार्टी आजपासून रायगड येथून जनसंपर्क दौऱ्याला सुरुवात करणार आहे. हा दौरा १५ दिवसांचा असून जुन्नर किल्ल्यावर १३ सप्टेंबर २०२६ ला या दौऱ्याची समाप्ती होईल.
त्यानंतर या मागण्यांबाबत मुंबईतील आझाद मैदानात ५ ऑक्टोबरला उपोषण करणार असल्याची माहिती राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय सहसचिव शुभम पाटील यांनी दिली.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी हैदराबाद ग्रंथालय रेकॉर्ड शेतकऱ्यांच्या नावासहीत राज्य सरकारने तेलंगणा सरकारकडून मागविण्यात येऊन ओबीसीमधून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास मुंबई कार्यान्वयन करण्यासाठी ८५० कोटी रुपये उपलब्ध करुन द्यावे, राज्यातील मराठी शाळेस १०० टक्के अनुदान देऊन बंद पडलेल्या मराठी शाळा सुरु कराव्यात,शेतकऱ्यांचे चालू कर्ज २ लाख रुपये माफ करावे, लाडक्या बहिणीचे १५०० रुपये दरमहा नवीन नोंदणी सुरू करून लाडक्या बहिणीचे थकीत अनुदान सुरू करावे, आदी मागण्या आहेत.
दौरा सातारा,सांगली, सोलापूर, लातूर अहिल्यानगर,परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम,यवतमाळ, वर्धा, नागपूर,अमरावती, बुलढाणा,अकोला, धुळे, नाशिक शासकीय विश्रामगृह येथे असा आहे.१३ सप्टेंबर २०२६ ला जुन्नर किल्ल्यावर दौऱ्याची समाप्ती होणार आहे.