

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून राज्याच्या विकासाला गती द्यावी. तसेच प्रत्येक पालकमंत्र्यांनी प्रत्येक घटकाच्या विकासासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांत 'नमो 11 कलमी कार्यक्रम' प्राधान्याने राबवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 'नमो 11 कलमी कार्यक्रमाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जगातील पाचव्या स्थानावर नेले आहे. त्याच धर्तीवर राज्यातही सर्व घटकांचा विकास करून राज्याला विकासाच्या पथावर नेण्याचा मानस या उपक्रमातून आपण साध्य करत आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. प्रत्येक घटकाचे जीवनमान उंचावण्यासाठी हा कार्यक्रम निश्चित मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.