

मुंबई : पाठदुखीचा त्रास होत असल्याचे कारण पुढे करत, मुंबई पालिकेतील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी महागड्या आलिशान गाड्यांची मागणी केली होती. या मागणीवरून वरिष्ठ नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी करण्यात आली. आरामदायी गाडीची मागणी त्यांना महागात पडली आहे.
इंधन व प्रदूषण कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक मंत्री अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक गाड्या वापरण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनीही इलेक्ट्रिक गाडीचा वापर सुरू केला. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना मात्र अलिशान इनोव्हा क्रिस्टा गाड्या हव्या आहेत.
पाठीचे दुखणे होत असल्यामुळे सध्याच्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाड्या नको असल्याचे रडगाणे महापौर विद्युत तावडे यांच्या दालनात गायले होते. वैज्ञानिक समितीचे अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांची ही मागणी प्रशासनापर्यंत पोहचवण्यात आली.
परंतु ही मागणी महायुतीच्या नेत्यांना पटलेली नाही. इंधन वाचवण्यासह प्रदूषण रोखणे हे भाजपा शिवसेना महायुतीचे टार्गेट आहे. पण आपलेच नगरसेवक असलेले पदाधिकारी अलिशान गाडी मागत असल्यामुळे वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत. नेत्यांनी फोन करून नाराजी व्यक्त करत कान उघडणी केली आहे. त्यामुळे पालिकेतील पदाधिकारी आम्हाला आलिशान गाड्यांची हौस नसल्याचे सांगत आहेत. आम्ही नागरिकांचे सेवक आहोत. त्यामुळे आम्हाला मारुती ८०० दिली तरी आम्ही ती वापरू, असे मत व्यक्त केले. आम्हाला दिलेल्या गाड्या या भाडेतत्त्वावरच्या आहेत. ज्या गाड्यांमुळे त्रास होत असेल तर त्या गाड्या बदलण्यात याव्यात, असे मत महापौर तावडे यांनी व्यक्त केले.
वैधानिक समित्यांचे अध्यक्षांसाठी गाड्या खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून भाजपावर विरोधकांकडून टीकास्त्र डागण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नाराज असल्याचे समजते. निरोप महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्याचे बोलले जात आहे.