

Railway Preliminary enquiry report on Mumbai Local Accident
मुंबई : सीएसएमटीहून कर्जतकडे जाणार्या लोकलमधील एक प्रवासी मुंब्रा येथील लोकल अपघाताला कारणीभूत असू शकतो, असे निरीक्षण अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकार्यांच्या समितीने नोंदवले आहे. मात्र, समितीच्या प्राथमिक निरीक्षणामुळे प्रवासी संघटनांमध्ये, प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण असून रेल्वे प्रशासनाला हे प्रकरण दाबायचे आहे, त्यामुळे निष्पाप प्रवाशांच्या माथी अपघाताचा ठपका ठेवला जात असल्याचा आरोप प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्यांनी केला आहे.
मुंब्रा येथे कसारा-सीएसएमटी आणि सीएसएमटी-कर्जत जलद लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तपासादरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनेवेळी लोकलच्या फूटबोर्डवर उभ्या राहिलेल्या दोन्ही लोकलमधील प्रवाशांमध्ये फक्त 0.75 मीटर अंतर होते. सीसीटीव्ही फूटेजचे निरीक्षण केले असता सीएसएमटीहून कर्जतला जाणार्या लोकलमधून खांद्यावर बॅग घेऊन फूटबोर्डवर उभ्या असलेल्या एका प्रवाशाने हात बाहेर काढला होता. तो कसा पडला हे समजलेले नाही. परंतु, ट्रेन मुंब्रा येथून जात असताना तो कसा तरी फूटबोर्डवरून पडला आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या जीआरपी पोलिसाला धक्का बसला. बॅग घेतलेला हा प्रवासी सीएसएमटी दिशेला जाणार्या ट्रेनमध्ये फेकला गेला व काही प्रवाशांना धडकला.
एक बॅग लागल्यामुळे रेल्वेचा डबा हलतो का?
बॅगमुळे इतका मोठा धक्का बसतो का की प्रवासी खाली पडतील?
वळणावर लोकलचा वेग कमी का केला गेला नाही?
मंगळवारी रात्री कुर्ला ते सायन दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. लोकलवर ही हाय व्होल्टेज वायर कोसळते पण यावर अद्याप कोणावरही कारवाई होत नाही?
मुंब्रा अपघात प्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीचा तपास सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण चौकशी झाल्यावर अंतिम अहवाल येईल. एका आठवड्यात हा अहवाल सादर केला जाणार आहे.
रेल्वे प्रशासनाने या घटनेत प्रवाशांनाच दोषी ठरवले असून हे अत्यंत निंदनीय आहे. जर प्रवाशांनाच दोषी ठरवत असाल तर गर्दीचे नियोजन न करणारे प्रशासन दोषी नाही का? स्वतःचे पाप लपविण्यासाठी प्रवाशांना दोष न देता गर्दीचे नियोजन करून प्रवाशांना सुखद व सुरक्षित प्रवास देण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.