मुंबई : देशातील अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईकरांचे जीवनमान फास्ट असून एक मिनिटही त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. पण एसी लोकलमुळे वेळेचे महत्त्वच उरलेले नाही. पूर्वी ठरलेली लोकल पकडण्यासाठी अक्षरशः मुंबईकरांची धडपड असायची परंतु आता एसी लोकलसाठी 30 ते 40 मिनिटांचा वेळ वाया घालवत आहेत.
मुंबई पश्चिम व मध्य रेल्वेच्या मार्गावर एसी लोकल सुरू झाल्यामुळे धाकधुकीचा प्रवास थोडा आरामदायी होऊ लागला आहे. पण या आरामदायी प्रवासासाठी मुंबईकरांना वेळेचे महत्वच राहिलेले नाही. एसी लोकलसाठी अनेकजण चर्चगेटला बांद्रा, दादर, मुंबई सेंट्रल, आदी रेल्वे स्टेशन येथून चर्चगेट दिशेने येऊन आपला विरारचा प्रवास सुरू करतात.
पूर्वी हेच प्रवासी त्या स्टेशनवर लोकल पकडून विरार गाठत होते. परंतु चर्चगेटवरून एसी लोकल प्रवाशांनी खचाखच भरून येत असल्यामुळे मरीन लाइन्स, चर्नीरोड, ग्रँटरोड, मुंबई सेंट्रल, दादर, बांद्रा आदी स्टेशनवर बसायला जागा मिळत नाही. त्यामुळे प्रवासी आपला सुमारे 20 ते 25 मिनिटांचा वेळ वाया घालवत रिटर्न प्रवास करतात. त्यामुळे चर्चगेट-विरार दीड तासाचा प्रवास दोन तासांवर पोहचत आहे.
एसी लोकलसाठी अनेक प्रवासी चर्चगेटसह अन्य रेल्वे स्टेशनवर किमान 40 ते 50 मिनिटे उभे असतात. एसी लोकलपूर्वी अनेक साध्या विरार लोकल असतानाही लोकलमधून प्रवास करण्यास कोणी तयार होत नाही. केवळ सायंकाळीच नाहीतर, नायगाव वसई, नालासोपारा येथील प्रवासीही विरारला रिटर्न जाऊन आपला चर्चगेटचा प्रवास सुरू करतात. त्यामुळे रोजचा प्रवास किमान चार ते साडेचार तास इतका होत आहे.
लागोपाठ एसी लोकल असून हाउसफुल
विरारला जाण्यासाठी चर्चगेट येथून लागोपाठ एसी लोकल असतानाही त्या प्रवाशांनी हाऊसफुल होतात. अनेकदा बांद्रा, अंधेरी आदी भागातील प्रवाशांना गाडीमध्ये चढता येत नाही. त्यामुळे लोकलचे दरवाजे बंद होण्यास विलंब होतो. यात प्रवासाचा वेळही वाढत आहे.