

मुंबई: राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने हिरवा कंदील दर्शवल्याने मुंबईत 15 मेपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात येत असून, मुंबईची ही पाणीकपात ठाणे आणि भिवंडीतही केली जाईल.
वाढत्या तापमानात बाष्पीभवनही वाढले आणि मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव आटू लागले आहे. ते पाणी चांगला पाऊस पडेपर्यंत पुरवावे लागणार असल्याने मुंबई महापालिकेने 10 टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव दिला होता. त्यावर राज्याच्या जलसंपदा विभागाने शिक्कामोर्तब केले.
ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातही मुंबईप्रमाणेच 10 टक्के पाणीकपात लागू असेल. जूनमध्ये समाधानकारक पाऊस पडला व पाणीसाठ्यात वाढ झाली तर सध्याची पाणीकपात मागे घेण्यात येईल, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. तोपर्यंत काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.