

मुंबई : झाडे पडण्याचे सत्र सुरूच असून गेल्या २४ तासांत मुंबईत तब्बल ५२३ झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. यात जोगेश्वरी येथे एका घरावर झाड पडून सातजण तर वरळी येथे झाड पडून रस्त्यावरून जाणारे दोन पादचारी असे ९ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुंबईतील झाडे जीवघेणी ठरत असून गेल्या २४ तासांत ५२३ पेक्षा जास्त झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. यात शहरात १८५, पूर्व उपनगरात १५० व पश्चिम उपनगरात १८८ झाडांचा समावेश आहे. आतापर्यंत झाडे पडून तिघांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी मध्यरात्री जोगेश्वरी पश्चिम येथील अशोक ब्रह्मा चाळ, मटर पाडा, आंबोली या येथे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरावर झाड पडून ७ जण जखमी झाले. त्यापैकी ३ जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला आहे. उर्वरित ४ जणांना कूपर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. यात रिंकू कनोजिया पुरुष (वय २५), मयंक कनोजिया ( वय १२), सुमित झगडे (वय २०) व संजीवनी झगडे ( वय ४८) यांचा समावेश आहे.
वरळी बाबासाहेब आंबेडकर भवन समोर रस्त्यावरून चालत जाणाऱ्या दोन व्यक्तींवर झाड पडले. यात ते जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यात एका ८३ वर्षांच्या जगन्नाथ सोर्ट या आजोबांचा समावेश असून राजेंद्र चव्हाण ४५ इसमाचा समावेश आहे. चव्हाण यांच्यावर वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये तर आजोबांवर एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पालिकेचे उद्यान खाते टेन्शनमध्ये
मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडे व फांद्या पडत अडून यात अनेकजण जखमी होत आहेत. त्यामुळे पालिकेच्या उद्यान विभागासह विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. झाड पडून होणाऱ्या मृत्यूला अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी राजकीय पक्षांकडून होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई :बुधवारपासून नवी मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी काही प्रमाणात ओसरला असला तरी वादळी वार्यामुळे वृक्षांची मोठी पडझड झाली. दिवसभरात ६२ झाडे, तर चार दिवसांत ८० झाडे उन्मळून पडली.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ४ जुलै रोजी २१० मिमी, ५ जुलै रोजी १७८ मिमी, तर सोमवारी दिवसभरात सरासरी ५३.४० मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाबरोबर वादळी वारे वाहत असल्याने मोठ्या संख्येने झाडांची पडझड झाली. आपत्कालीन मध्यवर्ती नियंत्रण कक्षात प्राप्त झालेल्या सूचना व तक्रारींनुसार आजच्या दिवसात ठिकठिकाणी ६२ झाडे पडल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.
झाडे पडण्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये व आपल्या गाड्याही झाडाखाली पार्क करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्या इमारती नवी मुंबई पालिकेने धोकादायक जाहीर केलेल्या आहेत वा धोकादायक स्थितीत आहेत, त्या तत्परतेने रिकाम्या कराव्यात, असेही नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
भरती असल्याने अलर्ट
मंगळवारी पहाटे ४.३८ वाजता ३.४४ मी. उंचीची भरती आहे. नवी मुंबई शहर हे समुद्रसपाटीपासून खाली वसलेले असल्याने भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस असल्यास सखल भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता आहे. या दृष्टीने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले.
आतापर्यंत २८३ वृक्ष कोसळले
कोपरखैरणे :नवी मुंबईत १ जून ते ६ जुलैपर्यंत २८३ वृक्ष पडले आहेत. धक्कादायक म्हणजे केवळ चार दिवसांत पावसात ८० वृक्ष पडले आहेत. वृक्ष छाटणी व्यवस्थित न केल्याने शहराची अपरिमित हानी झाल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करीत आहेत. यात मोठ्या प्रमाणात डेरेदार झाडांचा समावेश आहे. हीच झाडे शहराचे ऑक्सिजन ठरत होती. यात पाच वर्षे ते पन्नास वर्षापर्यंतची झाडे असल्याचा दावा पर्यावरणप्रेमी करीत आहेत. मी २५ वर्षांपासून वृक्षमित्र म्हणून काम करत आहे.
मान्सूनपूर्व केली जाणारी वृक्षछाटणी कशी करावी याचे तांत्रिक ज्ञान कमी आहे. चार फांद्या छाटणे म्हणजे छाटणी नसते तर झाडे पडू शकतील असे झाडांचे निरीक्षण करून पावसाने कुठल्या बाजूला पडू शकतात हे ताडून त्यानुसार छाटणी केली तर झाड पडत नाही, अशी माहिती अभिषेक जाधव यांनी दिली.
पनवेल : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चार दिवसांत कामोठे आणि कळंबोली परिसरात मिळून चार ठिकाणी स्लॅब कोसळल्याच्या घटना घडल्या असून, त्याच कालावधीत महापालिका हद्दीत चार दिवसात तब्बल १२९ झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही नोंदविण्यात आल्या आहेत.
कामोठे परिसरात स्लॅब कोसळण्याच्या तीन घटना घडल्या असून त्यापैकी एका दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. उर्वरित घटनेत जीवितहानी टळली. याचबरोबर मुसळधार पावसामुळे शहरातील मोठ्या प्रमाणावर झाडेही उन्मळून पडत आहेत. गेल्या चार दिवसांत १२९ झाडे उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी काही वाहनांचे नुकसान झाले असून, आपत्कालीन पथकांनी झाडे हटवून वाहतूक पूर्ववत केली.