

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी २२ हजार ६११ कोटींच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग व फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या १७ हजार ३६ कोटी तसेच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1 A आणि मार्ग २ च्या ५ हजार ५७५ कोटी अशा एकूण २२ हजार ६११ कोटींच्या प्रस्तावांना मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पायाभूत सुविधांचे प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याने वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
गायमुख ते फाउंटन हॉटेलदरम्यान ५.८६ किलोमीटर लांबीचा सहा पदरी भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदरदरम्यान ९.५८ किलोमीटर लांबीचा सहा पदरी उन्नत पूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम मुंबईला ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पनवेल तसेच राष्ट्रीय महामार्ग-४८ च्या दृष्टीने अधिक वेगवान आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होईल.
हा भुयारी मार्ग टीबीएम तंत्रज्ञानाद्वारे उभारण्यात येणार असून, त्याचा व्यास १४ मीटर असेल. सुमारे ५ वर्षांत हा बोगदा पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तर वसई खाडीला समांतर जाणाऱ्या उन्नत पुलावर ताशी शंभर किलोमीटर वेगाने वाहतूक शक्य होणार आहे.
घोडबंदर मार्गावरील वाढती वाहतूक आणि जड वाहनांचा ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून विशेषतः ठाणे व गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे शक्य होणार आहे.