

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिसून आले. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) पुढील चार दिवसांमध्ये अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार ८ सप्टेंबरपासून पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. ९ आणि १० सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहील. ११ आणि १२ सप्टेंबर रोजी हवामान प्रामुख्याने ढगाळ राहणार असून या दोन दिवसांसाठी पावसाचा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही.
तापमानाचा आढावा घेतल्यास मंगळवारी कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तर किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असू शकते. बुधवार आणि गुरुवारी कमाल तापमानात ( ३२ ते ३४ अंश सेल्सिअस) वाढ होण्याची शक्यता आहे.
किमान तापमान २४ ते २७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. शुक्रवार आणि शनिवारी (३१ ते ३३ अंश सेल्सिअस) पारा पस्तीशीच्या घरात जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.