Mumbai Rain Update : विक्रमी पावसात मुंबई ठप्प!

रूळ, रस्तेही पाण्याखाली; आणखी चार दिवस अतिवृष्टीचा इशारा
Mumbai Rain Update
Mumbai Rain Update : रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईत कोसळलेल्या सुमारे 300 मिलीमीटर पावसाने गेल्या दहा वर्षांतील उच्चांकी पर्जन्यवृष्टीची नोंद केली Mumbai stopped in record rain!

मुंबई/ठाणे| Mumbai Rain Update : रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईत कोसळलेल्या सुमारे 300 मिलीमीटर पावसाने गेल्या दहा वर्षांतील उच्चांकी पर्जन्यवृष्टीची नोंद केली आणि झोपेतून जागी झालेली मुंबई ठिकठिकाणी तुंबली, रखडली, ठप्प झाली आणि अखेर दिवसभर कोलमडली. यंदाच्या हंगामातील या पहिल्याच मुसळधारेत सुंदर आणि स्वच्छ मुंबईचे वाभाडे निघालेच. त्याचबरोबर रूळ पाण्याखाली गेल्याने सकाळपासून हार्बर, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेही पूर्णपणे ठप्प झाली.

सोमवारी आठवड्याचा पहिलाच दिवस म्हणून लेट मार्क झेलत कामावर पोहोचलेल्या मुंबईकरांची कार्यालये दुपारी तीन वाजताच सुटली, आमदार, कर्मचारीही ठिकठिकाणी अडकून पडल्याने विधिमंडळाचे कामकाजही पाण्यात बुडाले. हवामान खात्याने महामुंबई प्रदेशाला अतिवृष्टीचा इशारा दिल्याने शाळा सोमवारी अर्धवट सोडण्यात आल्या आणि मंगळवारी विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai Rain Update
कठुआतील भ्‍याड हल्‍ल्‍यामागे पाकिस्‍तानी दहशतवादी

दरम्यान, केरळ ते कोकण किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने मान्सून वार्‍याचा वेग ताशी 50 किलोमीटर इतका झाला आहे. त्यामुळे या संपूूर्ण किनारपट्टीला आगामी 24 तास पूरस्थितीचा अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राला आगामी चार दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह किमान 22 ठिकाणी एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.

यंदा मुंबई तुंबणार नाही असे दावे रेल्वे आणि मुंबई महापालिका प्रशासनाने केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यंदा तुंबई होणार नाही, अशी गॅरंटी दिली होती. मात्र, सहा तास झालेल्या अतिवृष्टीत शासन-प्रशासनाचे दावे वाहून गेले.

Mumbai Rain Update
'बीसीसीआय'ने जाहीर केलेल्या 125 कोटी रूपयांच्या बक्षिसाची अशी होणार वाटणी

मुंबईकरांना गेल्या सव्वा महिन्यापासून हुलकावणी देणार्‍या पावसाने सोमवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास मुंबईवर मुसळधार धरली. मध्यरात्री आणि पहाटे मुंबईत तितकी वर्दळ नसते. त्यामुळे या कोसळधारेची जाणीव गाढ झोपी गेलेल्या मुंबईकरांना नव्हती. मात्र, पहाटे पाचनंतर मुंबईकर बाहेर पडले आणि ठिकठिकाणी मग अडकून पडू लागले. रुळ कधीच पाण्याखाली गेले होते. त्यामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली. हार्बर मार्गावरील लोकल सेवेचे तीनतेरा वाजले. सकाळपासून बंद झालेली हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल लोकल दुपारी दीड वाजता सुरू झाली. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलचीही रखडपट्टी सुरूच होती. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेले प्रवासी स्थानकातच अडकून पडले.

Mumbai Rain Update
आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, ९ जुलै २०२४

पावसामुळे सखल भागातील सायन, कुर्ला, चुनाभट्टी रेल्वे स्थानकात पाणी भरले. विद्याविहार, कुर्ला, सायन, भांडुप आणि नाहूर स्थानकांत रेल्वे रुळांवर 4 इंचापर्यंत पाणी आल्याने पहाटेपासूनच ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा बंद झाली होती. ठाणे ते कल्याण, कसारा, कर्जत दरम्यान रेल्वे प्रशासनाने स्पेशल शटल सेवा सुरु ठेवली होती. परंतु या गाड्यांचाही वेग मंदावला होता. कल्याण, बदलापूर, अंबरनाथ ते सीएसएमटी लोकल बंद असल्याने ठाण्याच्या पुढील सर्वच स्थानकात प्रवाशांची एकच गर्दी झाली होती. प्लटफार्मवर गाड्या उभ्या असल्याने त्यामध्ये प्रवासी बसून होते. स्थानकातील इंडिकेटर बंद असल्याने प्रवाशांचे आणखीनच हाल झाले. बराच वेळ स्थानक आणि लोकलमध्ये अडकल्याने महिला प्रवाशांची प्रचंड कुचंबना झाली. अनेक स्थानकात स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध नसल्याने महिलांची कुचंबणा झाली.

Mumbai Rain Update
Nashik News | शिक्षकास पोलिसांकडून नाहक मारहाण

हार्बर मार्गावरील चुनाभट्टी, वडाळा स्थानकात देखील रुळांवर पाणी आल्याने सीएसएमटी ते वाशी दरम्यानची लोकल सेवा खोळंबली होती. प्रवाशांच्या सोयीसाठी वाशी ते पनवेल लोकल धावत होत्या. वडाळा ते किंग सर्कल स्थानकांदरम्यान रुळावर पाणी साचल्याने सीएसएमटी ते बांद्रा-गोरेगाव लोकल देखील विस्कळीत होती. याचा सर्वाधिक फटका सकाळी कामावर निघालेल्या कर्मचार्‍यांना बसला. सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या कर्मचार्‍यांना तासनतास लोकलमध्येच बसावे लागले. लोकल पुढे जात नसल्याचे समजल्यावर बर्‍याच जणांनी लोकलमधून उतरुन रुळांवरील गुडघाभर पाण्यातून वाट काढत रस्ते मार्गाने कामावर पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथेही त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

सकाळी साडेसहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत पनवेल ते सीएसएमटी थेट लोकल सेवा बंद होती. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते मानखुर्द आणि वाशी दरम्यान लोकल चालविण्यात येत होत्या. त्यामुळे हार्बर मार्गावरील स्थानकात प्रवाशांची एकच गर्दी झाली होती. पनवेलहून सीएसएमटीला कामानिमित्त निघालेले प्रवासी मानखुर्द स्थानकानंतर लोकल पुढे जात नसल्याने घरी परतले. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते नेरुळ-पनवेल आणि नेरुळ-खारकोपर-उरण दरम्यानची लोकल सेवा सुरळीत होती. पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत, परंतु विलंबाने सुरू होती.

वेग मर्यादेमुळे खोळंबा

रुळांवरील पाणी ओसरल्यानंतर मध्य रेल्वेने लोकलची वाहतूक सुरू केली असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून वेग मर्यादा घातली होती. साधारणपणे नेहमी उपनगरीय मार्गावर लोकल 80-85 किमी प्रति तासाने धावतात. परंतु रेल्वेने सोमवारी किमान 30 ते 40 किमी प्रतितास वेगाची मर्यादा घातल्याने लोकलचा वेग आणखीनच मंदावला होता. त्यामुळे गाड्या एकामागोमाग एक धावत असल्याने गाड्यांचे बंचिग झाले होते. रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्यासाठी रेल्वेने सोमवारी हजारो लोकल रद्द केल्या.त्याचा फटका प्रवाशांना बसला. प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागला.

कुठे, किती पाऊस?

पश्चिम उपनगरातील पवई परिसरात सर्वाधिक 315 मीमी पेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे या भागातील संपूर्ण जनजीवनच ठप्प पडले झाले. सकाळी 9 वाजल्यानंतर मात्र येथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आले. अंधेरी पूर्व 298 मिमी, मालपा डोंगरी 292 मिमी, गोरेगाव 279 मिमी, चकाला 278 मिमी, आरे वसाहत 258 मिमी, वाकोला 240 मिमी, कलेक्टर कॉलनी चेंबूर 222 मिमी, शिवडी कोळीवाडा 185 मिमी, रावळी कॅम्प 176 मिमी, धारावी काळा किल्ला 165 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाल्यामुळे हा भाग संपूर्ण पाण्याखाली गेला होता.

आभाळ फाटल्याप्रमाणे पडलेल्या पावसामुळे या भागातील नागरिकांची अक्षरश: झोप उडाली. घरात पाणी शिरेल या भीतीपोटी बैठ्या घरातील विशेषतः झोपडपट्टीतील नागरिक सकाळपर्यंत डोळ्यात तेल घालून बसले होते. सकाळी पाऊस कमी झाल्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

हार्बर मार्ग पुन्हा ठप्प!

सोमवारी संध्याकाळी वडाळा स्थानकात पाणी भरल्याने सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान हार्बर लोकल रात्री सव्वा दहापासून बंद करण्यात आलीे. हार्बरच्या प्रवाशांनी मुख्य मार्गावरून कुर्ला स्थानकापर्यंत प्रवास करावा, अशी उद्घोषणा स्थानकात करण्यात येत होती. मानखुर्द ते पनवेल लोकल मात्र सुरु होती. दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर पॉईंट फेल झाल्याने जलद मार्गांवरील वाहतूक धीम्या मार्गांवरून वळविण्यात आली.

अशी कोलमडली लाईफलाईन

  • सकाळी साडेसहा वाजता : भांडुप ते नाहूर दरम्यान पाणी भरल्याने अप आणि डाऊन जलद-धिम्या मार्गावरील लोकल सेवा बंद

  • सकाळी साडेआठ वाजता : मेन लाईनवरील अनेक स्थानकांत पाणी भरल्याने सीएसएमटी ते ठाणे जलद मार्गावरील वाहतूक ठप्प

  • सकाळी साडेनऊ वाजता : चुनाभट्टी स्थानकात पाणी भरल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक बंद

  • सकाळी साडेदहा वाजता : सीएसएमटी ते ठाणे दरम्यानची अप-डाऊन जलद मार्गावरील वाहतूक वेग मर्यादेने सुरू

  • सकाळी अकरा वाजता : पनवेल ते मानखुर्द आणि सीएसएमटी ते वडाळा-गोरेगाव लोकल सुरू

  • दुपारी दीड वाजता : वडाळा ते मानखुर्द लोकल पूर्वपदावर

दशकातील विक्रम

  • राज्य शासन आणि प्रशासनाला रस्तोरस्ती बलेल्या पाण्यात गाठणारा हा पाऊस विक्रमीच होता आणि त्याने या दशकातील दुसरा विक्रमी पाऊस म्हणून आपली नोंद केली.

  • सोमवारी पहाटे 2.30 ते सकाळी .30 पर्यंत 268 ते 300 मिमी पावसाची नोंद मुंबईत झाली.

  • यापूर्वी 2 जुलै 2019 रोजी मुंबईत एका दिेवसातील सर्वाधिक 375.2 मिमी पाऊस कोसळला होता. सोमवारी पहाटे 2.30 वाजता पावसाची नोंद 40.9 मिमी होती. पहाटे 5.30 वाजता ती 210.9 मिमी झाली. पहाटे 5.30 ते

  • सकाळी 8.30 दरम्यान आणखी 57 मिमी पावसाची भर पडली.

  • महापालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्राच्या नोंदीनुसार सर्वाधिक 327 मिमी पाऊस पवईत कोसळला. त्याखालोखाल अंधेरीत 303, तर चकालात 297 मिमी पावसाची नोंद झाली.

  • 26 जुलै 2005 रोजी मुंबईत 944.2 मिमी हा आजवरचा विक्रमी पाऊस कोसळला आणि जलप्रलय आला. त्याच्या आसपासही जाणारा पाऊस आतापर्यंत पडलेला नाही. मात्र, विक्रमी पाऊस आणि मुंबई यांच्याशी जुलै महिन्याचे नाते अजूनही कायम दिसते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news