

कांदिवली : मुंबईतील चारकोप परिसरातील सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी चारकोप पोलिसांनी जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातून शफीर रशीद चौधरी (वय २७) व वकार अहमद नाझीर हुसेन (वय ३१) या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ६४ लाख ९५ हजार रुपयांच्या ४३३ ग्रॅम वजनाच्या ४९ सोन्याच्या बांगड्या हस्तगत केल्या.
यासंदर्भात कांदिवली चारकोप येथे राहणारे अशोक अमृतलाल वाया (वय ६३) यांनी १४ मे रोजी चारकोप पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या चारकोप इंडस्ट्रियल इस्टेट येथील श्रीजी मॅन्यूफॅक्चर्स कंपनीतून तीन आरोपींनी संगनमत करून सोन्याच्या बांगड्यांची चोरी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. सुरुवातीला चोरी गेलेल्या दागिन्यांचे वजन ३१७६ ग्रॅम सांगण्यात आले होते. मात्र पुढील तपासात चोरी गेलेले दागिने ८६४.२८ ग्रॅम असल्याचे स्पष्ट झाले.
गुन्हा घडल्यानंतर आरोपींनी मोबाईल फोन बंद करून फरार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. चारकोप पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात लपल्याची माहिती मिळवली. त्यानंतर दोन विशेष पथके जम्मू-काश्मीरला रवाना झाली.
भारत-पाकिस्तान सीमेलगतचा संवेदनशील परिसर असल्याने यावेळी स्थानिक पुंछ व मंडी पोलिसांच्या हत्यारबंद पथकाची मदत घेण्यात आली. संयुक्त कारवाईत पोलिसांनी दोघांना शिताफीने अटक केली. चौकशीत आरोपींनी चोरीतील सोन्याच्या बांगड्या पुंछ जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागात पुरून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी उंच डोंगर परिसरातून ४९ सोन्याच्या बांगड्या हस्तगत केल्या.
अटक आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. फरार आरोपी व उर्वरित मुद्देमालाचा तपास सुरू असल्याची माहिती चारकोप पोलिसांनी दिली.
सदर कारवाई पोलीस आयुक्त, उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि. राजेंद्र कुंभार पोउनि आबासाहेब पवार आणि पथकाने केली.