

मुंबई: या वर्षी मुंबई तुंबणार नाही, अशी ग्वाही पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली असून त्या दिशेने तयारी सुरू आहे. मंगळवारी मान्सूनपूर्व कामाचा त्यांनी आढवा घेतला. सर्व पाणीउपसा पंप 5 मे पर्यंत कार्यान्वीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
यावर्षी प्रथमच, हे पंप आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) तंत्रज्ञानाशी जोडले जाणार आहेत. यामुळे कोणते पंप चालू किंवा बंद आहेत हे समजणार असून त्यावर तत्काळ उपायोजना करता येणार आहेत. त्यामुळे अधिक वेळ पाणी तुंबून राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईतील पाणी साचण्याची 93 ठिकाणे निश्चित केली असून येथील जलनिःसारण व्यवस्था सुधारण्यासाठी एक विशेष योजना तयार करण्यात आली आहे. पाणी साचल्यास तत्काळ दिलासा देण्यासाठी 547 पोर्टेबल डीवॉटरिंग पंप बसवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त, 15 मे पासून या ठिकाणी 247 कर्मचारी तैनात केले केले जाणार आहेत.
प्रशासनाने रिअल-टाइम मॉनिटरिंगसाठी नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) देखील अद्ययावत केला असून तेथून संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवले जाणार आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये मोबाईल पंपिंग वाहने उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत.
मुंबईतील 174 इमारती अतिधोकादायक
शहरातील 174 इमारती अती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. यापैकी अनेक इमारतींमध्ये अजूनही रहिवासी आहेत. महापालिकेने येथील रहिवाशांना तत्काळ इमारती रिकाम्या करण्याचे आवाहन केले असून, अपघात झाल्यास रहिवासीच जबाबदार असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पर्जन्य जलवाहिन्या, रस्ते व वाहतूक, नाले सफाई, धोकादायक इमारती, मध्य रेल्वे, मेट्रो रेल्वे(ॲक्वा लाईन), मुंबई अग्निशमन दल, दरड कोसळणारे ठिकाण आणि आरोग्य अशा विविध विभागांनी केलेल्या कामांचा आढवा घेण्यात आला. प्रत्येक विभागाने त्यांच्या कामांचे सादरीकरण यावेळी केले. राहिलेली कामे मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
- अश्विनी भिडे, आयुक्त, महापालिका