

Mumbai Rain
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबईसह संपूर्ण पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने मुंबईला आधीच 'यलो अलर्ट' दिला होता, त्यानुसार मध्यरात्रीपासूनच पावसाची सुरुवात झाली. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे सकाळच्या सुमारास कामावर निघणाऱ्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
मुंबईत मध्यरात्रीपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते आणि काही भागांत रिमझिम पाऊस सुरू झाला होता. सकाळी पूर्व उपनगरातील भांडुप, मुलुंड परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर मध्य मुंबईतील दादर आणि आसपासच्या परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह रिमझिम पावसाने हजेरी लावली. सध्या मुंबईत सर्वत्र दाटून आलेले ढगाळ वातावरण असून गारवा निर्माण झाला आहे. वसई-विरार शहरात आज सकाळपासून विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी लावली आहे.
महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचे भाकीत खरे असले तरी मान्सून सरासरी 98 टक्के इतका होण्याची शक्यता आहे. कारण सध्या अल निनो सक्रिय झालेला नाही. तसेच भारतीय समुद्री स्थिरांक तटस्थतेकडून सकारात्मकतेकडे जात आहे. त्यामुळे न घाबरता कमी पाण्याची पिके सुरुवातीच्या काळात घ्यावीत, असा सल्ला पुणे येथील ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.
डॉ. साबळे हे गत 24 वर्षांपासून त्यांनी विकसित केलेल्या साबळे मॉडेलद्वारे मान्सूनचा अंदाज 1 जून रोजी देतात. सोमवारी त्यांनी जून ते सप्टेंबर या कालावधीतील दीर्घ पर्जन्यमानाचा अंदाज दिला. यात राज्यातील 84 तालुके आणि 17 जिल्ह्यांचा समावेश आहे. वार्याचा वेग, हवेचा दाब ही गृहीतके वापरून हा अंदाज देण्यात आला असून मॉडेलमध्ये अधिक-उणे 5 टक्के त्रुटी गृहीत धरण्यात आली आहे.