

मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौरपदाची आरक्षणाची सोडत गुरुवारी (दि. 22) काढण्यात आली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मुंबईलगतच्या नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि पुणे, नाशिक, नागपूरमध्येही सर्वसाधारण गटातील महिला महापौरपदी विराजमान होणार आहेत, तर कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण ओबीसी गटासाठी राखीव झाले आहे.
आता महापौरपदाबाबत अधिक स्पष्टता आल्याने मुंबईच्या महापौरपदी कोणाला बसवायचे, याला अधिक वेग येणार आहे. मुंबई महापालिकेचे महापौरपद भाजपकडे जाण्याची शक्यता असल्याने भाजपमधील विविध नगरसेविकांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.
29 महापालिकांपैकी 15 महापालिका विविध प्रवर्गांतील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई, पुणेसह या 15 महापालिकांमध्ये ‘महिलाराज’ असणार आहे. राज्यातील 29 महापालिकांची अटीतटीची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यानंतर सगळ्यांचे लक्ष महापौरपदाच्या आरक्षणाकडे लागले होते. कारण, आरक्षणाची सोडत निघाल्यानंतरच कोण महापौरपदी बसणार, हे स्पष्ट होणार होते. त्यानुसार महानगरपालिकांमधील महापौरपदाची आरक्षणाची सोडत मंत्रालयात गुरुवारी सकाळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली आहे.
29 महानगरपालिकांपैकी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी कल्याण - डोंबिवली महापालिका या एकाच महापालिकेतील महापौरपद आरक्षित झाले आहे. एकच पद आरक्षित होत असल्याने नियमातील तरतुदीनुसार अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी पद आरक्षित होत नाही. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 3 पदे आरक्षित झाली असून, त्यापैकी 2 पदे अनुसूचित जाती (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी 8 पदे आरक्षित झालेली असून, त्यापैकी 4 पदे नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहेत. उर्वरित 17 महानगरपालिकांमधून सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी 9 पदे आरक्षित असून, 8 पदे खुला (सर्वसाधारण) या प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत.
ठाकरे गट, काँग्रेसचा आक्षेप
मुंबई ः शिवसेना ठाकरे गटाने महापौरपदाच्या आरक्षण सोडतीलाच आक्षेप घेतला. सत्ताधारी पक्षाने स्वत:चे बहुमत लक्षात घेऊन लॉटरी काढल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी या प्रक्रियेचा निषेध केला. आरक्षणाच्या वेळी अनुसूचित जमाती व महिला ओबीसी ही चिठ्ठी टाकली गेली नाही. यापूर्वी मुंबई महापालिकेचे महापौरपद हे खुल्या गटातील महिलांसाठी राखीव झाले असताना आपल्याकडील संख्याबळ पाहून पुन्हा खुल्या गटातील महिलांची लॉटरी काढण्यात आली. ठाकरे गटाकडेच अनुसूचित जमातीचे दोन्ही नगरसेवक असल्याने या प्रवर्गाची चिठ्ठीदेखील टाकण्यात आली नाही. एसटी प्रवर्गाचे उमेदवार तीन तरी असायला पाहिजेत. मगच तेथील चिठ्ठी टाकण्याचा नवीनच नियम काढला गेला. आमच्याकडे एसटीचे दोन उमेदवार आहेत. त्यामुळे मुंबईत हा नियम लावला. याचा अर्थ लॉटरी ठरवून केली, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मात्र संपूर्ण प्रक्रिया पूर्ण पारदर्शकतेने आणि नियम पाळूनच पार पाडण्यात आली आहे. ठाकरे गटाला जे हवे होते ते न झाल्याने त्यांनी आरडाओरड केल्याचे प्रत्युत्तर दिले. ज्या ठिकाणी एसटी प्रवर्गाच्या किमान तीन जागा असतील तेथे एसटी आरक्षण कार्यवाही करण्याची प्रचलित पद्धत आहे. आम्ही नियमाप्रमाणे आणि पारदर्शक पद्धतीने संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करून ही प्रक्रिया पार पाडली आहे. त्यामुळे पेडणेकर यांच्या आक्षेपांना काहीही अर्थ नाही, असे मिसाळ म्हणाल्या.
नागपूर ः राज्यातील 29 महापालिका महापौर आरक्षणासाठी काढलेली सोडत म्हणजे भाजपचे फिक्सिंग असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते म्हणाले, ही सोडत म्हणजे फिक्सिंग होती. त्यात पारदर्शक पद्धतीचा अभाव होता. नागपुरात खुला महिला प्रवर्ग काढण्यात आला. कारण, त्यासाठी भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार शिवानी दाणी यांचे नाव आधीच निश्चित झाले आहे.
महायुतीचा महापौर डौलाने बसेल : शेलार
महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत ही नियमानुसार झाली आहे. आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबई महानगरपालिकेत बसेल, तो देखील वाजतगाजत डौलाने बसेल, असा टोला भाजपा नेते मंत्री आशिष शेलार यांनी उबाठा शिवसेनेला लगावला.ते म्हणाले, आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो. त्या प्रक्रियेनुसार जी काही आरक्षण सोडत झाली, ती कायद्यानुसार, परंपरेनुसार व नियमानुसार झाली. आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल. वाजगतगाजत बसेल. मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल. मराठी माणसांच्या सेवेसाठी बसेल. संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल. महायुतीचा महापौर डौलाने बसेल, असे ते म्हणाले.
महापौरपदांचे आरक्षण
अनुसूचित जमाती : कल्याण-डोंबिवली
अनुसूचित जाती : ठाणे, जालना (महिला), लातूर (महिला)
ओबीसी प्रवर्ग : पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर, उल्हासनगर
ओबीसी महिला प्रवर्ग : जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर, अकोला
सर्वसाधारण महिला : पुणे, धुळे, मुंबई, नवी मुंबई, नांदेड-वाघाळा, मालेगाव, मीरा-भाईंदर, नागपूर, नाशिक
खुला प्रवर्ग : छत्रपती संभाजीनगर, परभणी, सांगली-मिरज-कुपवाड, अमरावती, वसई-विरार, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, भिवंडी-निजामपूर