

मुंबई: मुंबई शहर व उपनगरांत मोठ्या प्रमाणात कोळीवाडा गावठाण व आदिवासी पाडे आहेत. या ठिकाणी पुरेशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात या कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
मुंबई शहर व उपनगरात 31 कोळीवाड्यांसह गावठाण व 30 पेक्षा जास्त छोटे मोठे आदिवासी पाडे आहेत. पण यातील अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना अनेक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पालिकेने सर्व कोळीवाड्यांसह गावठाण आदिवासी पाड्यांचा सर्वे करून, मूलभूत सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
या सुविधांमध्ये मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्या टाकण्यासह नळ जोडण्या देणे, अंतर्गत पायवाटा यांची सुधारणा करून नवीन शौचालय बांधणे, यात महिलांसाठी व अपंगांसाठी विशेष सुविधा करण्यात येणार आहे. सर्वांसाठी पाणी धोरण अंतर्गत प्रत्येक घरामध्ये नळ जोडणी मागणीनुसार देण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाडे, गावठाणे आणि आदिवासी पाड्यांच्या पुनर्विकासासाठी विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) अखेर मुंबई महापालिकेने विकास आराखडा 2034 मध्ये बनवला.
या नियमावलीत आराखडा मसूदा समितीने कोळीवाडे, गावठाणातील 9 आणि 12 मीटर रस्ते असलेल्या परिसरातील भूखंडांच्या पुनर्विकासाला जास्तीत जास्त एफएसआय देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे कोळीवाडा व गावठाणामध्ये अन्य मुंबईकरांप्रमाणे सर्व पायाभूत सुविधा देणे शक्य होणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
आदिवासी पाड्यांना वन्य प्राण्यांपासून संरक्षण
मुंबईतील नॅशनल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी पाडे असून त्यांना वन्य प्राण्यापासून धोका आहे. त्यामुळे या पाड्यातील नागरिकांच्या सुरक्षितेसाठी विशेष लक्ष देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी आदिवासी पाड्यांमध्ये काय करता येईल, याचा लवकरच अभ्यास करण्यात येणार आहे. याचा अहवाल आल्यानंतर सुरक्षितेच्या उपायोजना हाती घेण्यात येतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.