

मुंबई: वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयातील रक्तपेढीतील गंभीर अनियमितता पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सलग दुसऱ्यांदा कारवाई करत रक्तपेढीचा परवाना चार दिवसांसाठी निलंबित केला आहे. कागदोपत्री कर्मचारी दाखवून प्रत्यक्षात सेवा न देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नियमांनुसार रक्तपेढीसाठी प्रशिक्षित तंत्रज्ञांची उपस्थिती अनिवार्य असताना, वैशाली भारती, स्मिता आंब्रे व वर्षा झांझे ही नावे नोंदवून प्रत्यक्षात ते कामावर हजर नसल्याचे आढळले. विशेष म्हणजे, एफडीए तपासणीवेळीच हे कर्मचारी ‘ड्युटीवर’ दाखवले जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. परवान्यासाठी सादर कागदपत्रांमध्येही चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप आहे.
या मनमानीमुळे रक्तपेढीची सेवा मर्यादित झाली असून सध्या ती फक्त सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेतच सुरू आहे. 24 तास सेवा देणे बंधनकारक असतानाही रात्रीची शिफ्ट टाळली जात असल्याने रुग्णांना मोठा फटका बसत आहे.
सामाजिक कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वीही कारवाई होऊनही सुधारणा न झाल्याने आता कडक उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.