

मुंबई : होळी तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आता वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांनी वेग घेतला आहे. त्यामुळे माणगाव व इंदापूर बायपास वगळता उर्वरित मुंबई-गोवा महामार्ग मे महिन्यापर्यंत पूर्णत्वाला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेत भाजपचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रलंबित कामाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेताना म्हटले की, या महामार्गावरून जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. समृद्धी महामार्ग झाला, पण मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्षे कंत्राटदारांमुळे रखडला गेला आहे. त्यामुळे हा महामार्ग कधी पूर्ण होणार आणि गांधारपाले लेणी येथे पर्यटनाच्या दृष्टीने बांधकाम विभागाने पुढाकार घ्यावा,
अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली. तसेच अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे यांनीही महामार्गासंदर्भात उपप्रश्न विचारले. या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, माणगाव व इंदापूर बाह्य वळण मार्गासह तीन रेल्वे उड्डाणपूल आणि दोन मोठ्या पुलांच्या कामांचा समावेश आहे. जुलै 2025 मध्ये ही कामे सुरू केली आहेत. संबंधित ठेकेदार काम करत नसल्याने नवीन ठेकेदार नेमला. सध्या माणगाव-इंदापूर बायपास या भागातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम नव्या एजन्सीमार्फत प्रगतिपथावर आहे.
जुलै 2027 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर माणगाव येथे वाहतूक कोंडी होणार नाही. चिपळूण येथील पुलाचेही मुख्य काम पूर्ण झाले असून, मे 2026 पर्यंत तो वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला केला जाईल. तसेच संगमेश्वर येथील हातखंबा उड्डाण पुलाचे काम एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होईल. येत्या गणेशोत्सवातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी माणगाव-महाड मार्गावरील ताम्हिणी घाटाचा बाह्य वळण मार्ग पावसाळ्यापूर्वी (मे महिन्यात) पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.