

मुंबई: मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे १५ ऑगस्टनंतर मोठ्या प्रमाणात आगमन होणार असल्यामुळे मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यावेळी मंडपाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक राहणार आहे. विशेष म्हणजे ऑडिट होते की नाही, याची शहानिशा करण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयामार्फत पाहणी करण्यात येणार आहे.
मुंबईत २० ते ३० फुटापर्यंत गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. यासाठी रस्त्यावर सुमारे ४० फुटापर्यंत म्हणजे सरासरी तीन मजली इमारतीएवढे मंडप उभारण्यात येतात. बांबू, लोखंड, ताडपत्री आदीचा वापर करून हे मंडप उभारण्यात येतात.
भर पावसात गणेशोत्सव येत असल्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात वादळी वारे असतात. त्यामुळे गणेश मंडप कोसळण्याची भीती असते. यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
परंतु अनेक मंडळे याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे यंदा स्ट्रक्चरल ऑडिटची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मंडपाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले की नाही, याची मंडपाच्या ठिकाणी जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांमार्फत शहनिशाही करण्यात येणार आहे.
मजबुतीला महत्त्व
मंडप बांधताना तो मजबूत आहे की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी मंडप डेकोरेशनवाल्यासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची राहणार आहे. किमान महिनाभर हा मंडप भर रस्त्यात उभा असल्यामुळे मंडप उभारण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य यात लाकडी बांबू, लोखंडी साहित्य, ताडपत्री योग्य प्रतीची आहे की नाही. भर पाऊस व वाऱ्यामध्ये मंडप तग धरू शकतो की नाही, व अन्य तपासणी स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये करावी लागणार आहे.
मंडपांची संख्या ६ हजार ३००
मुंबई शहर व उपनगरात रस्त्यावर व मैदानात उभारण्यात येणाऱ्या मंडपाची संख्या सुमारे ६,३०० इतकी आहे. या सर्वाधिक मंडप मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून उभारण्यात येतात. यात लालबागच्या राजासह गणेश गल्ली, गिरगाव, चिरा बाजार, चंदनवाडी व अन्य महत्त्वाच्या गणेशोत्सव मंडळांच्या बापांचा समावेश आहे. या मंडपाची त्या त्या विभागांमार्फत तपासणी करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.