

मुंबई: अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत यंदाही मुंबई विभागातील नामांकित महाविद्यालयांच्या कटऑफने 90 टक्क्यांचा टप्पा सहज पार केला असला, तरी गतवर्षीच्या तुलनेत बहुतांश नामांकित महाविद्यालयांमध्ये 0.5 ते 2 टक्क्यांपर्यंत सौम्य घसरल्याचे चित्र समोर आले आहे.
अकरावी प्रवेशाची पहिली यादी शुक्रवारी सकाळी 11 वाजता जाहीर झाल्यानंतर सायंकाळी 7 वाजेपर्यंत राज्यभरातील 49 हजार 255 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित केले आहेत.
शुक्रवारी पहिल्या दिवशी झालेल्या 49 हजार 255 प्रवेशांपैकी पुणे विभागातून सर्वाधिक 11 हजार 814 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्याखालोखाल नागपूरमधून 7 हजार 524, मुंबईतून 7 हजार 460, कोल्हापूरमधून 6 हजार 378, नाशिकमधून 5 हजार 698, छत्रपती संभाजी नगरमधून 4 हजार 297, अमरावतीमधून 3 हजार 542 आणि लातूर विभागातून 2 हजार 542 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
दहावीमध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा चार हजारांहून अधिकने घटल्याचा परिणाम पहिल्या यादीवर दिसून आला. वाणिज्य शाखेत माटुंगा येथील आर. ए. पोदारचा 94.20 टक्के, तर विज्ञान शाखेत वाशी येथील फादर ॲग्नेलचा 93.60 टक्के हा यंदाच्या यादीतील सर्वाधिक कटऑफ राहिला आहे.
ज्या महाविद्यालयात गेल्या वर्षी 93 ते 95 टक्क्यांच्या दरम्यान असलेली यादी यंदा 92 ते 94 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने वरचढ गुणांसाठीची स्पर्धा तुलनेने कमी झाली आणि त्याचा परिणाम प्रवेशाच्या पहिल्या यादीत स्पष्टपणे दिसून आला. 90 प्लस गुणधारकांच्या संख्येतील घट याच्याशीही संबंधित असल्याचे कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी सांगितले.