

मुंबई: सध्या पावसाळी मासेमारी बंदीमुळे स्थानिक बाजारात ताजा माशांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. परिणामी, माशांचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील बाजारात पूर्व भारतामधील पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश येथील किनारपट्टीमधून माशांची आवक होत आहे.
वाहतूक खर्च वाढल्याने व माशांची आवक कमी झाल्याने मुंबईतील किरकोळ बाजारात सध्या पापलेट १७०० प्रतिकिलो, सुरमई मासा १२०० रुपये इतका झाला आहे.गेल्या तीन महिन्यांपासून सरासरी २५० ते ३५० रुपये प्रतिकिलो माशांच्या दरात वाढ झाल्याचे मुंबईतील विक्रेत्याकडून सांगण्यात आले.
दरवर्षी जूनपासून महाराष्ट्रात समुद्रातील मासेमारी बंद होते.ती दोन ते तीन महिने असते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत माशांची आवक कमी होते.पूर्व किनारपट्टीवरील समुद्रातून माशांची आवक याठिकाणी होते.
मुंबईतील किरकोळ बाजारात रविवारी पापलेट सतराशे रुपये प्रतिकिलो,रावस १५०० प्रतिकिलो, सुरमई १२००, तर बोंबील ७५० रुपये प्रतिकिलो होता.स्थानिक माशासाठी ग्राहकांना गोठविलेल्या (फ्रोझन) माशांवर अवलंबून राहावे लागत आहे.
माशांचे दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहक कमी- अधिक प्रमाणात बाजारात आहे. क्रॉफर्ड मार्केटजवळील छत्रपती शिवाजी महाराज मच्छीमार बाजार, ग्रँड रोडवरील लोकमान्य टिळक,माहीम येथील सिटीलाईट मच्छीमार बाजार, मालाड रेल्वे स्थानक याठिकाणी मोठा बाजार आहे, तर शहर व उपनगरांत छोटे १०८ मच्छीमार बाजार आहेत.मुंबईत सुमारे ३० हजार तर मुंबई जिल्हा वगळता महाराष्ट्रात सुमारे १ लाख मच्छीमार विक्रेते आहेत.
याबाबत क्रॉफर्ड मार्केटमधील विक्रेते शेखर घाडगे म्हणाले, माशांची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे.त्याचबरोबर समुद्रात मासेमारी करण्यासाठी बोटीमध्ये बल्क वर्गातील डिझेल लागते.बल्क डिझेल सातत्याने वाढणाऱ्या लिटरच्या किमतींमुळे मासेमारीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
पावसाळी बंदी संपल्यानंतरही माशांचे दर पूर्वपदावर येण्याची शक्यता कमी आहे. वाहतूक खर्च वाढ व माशांचा मर्यादित पुरवठा यांसारखे घटक पुढील काळात मासेमारीच्या किमतींवर परिणाम करत राहतील.